

Naxalism Internal Security Challenge India 2026
esakal
लेखक : गौरव बाळे
भारतीय लोकशाहीसमोरील दशकानुदशके चाललेले सर्वांत मोठे अंतर्गत सुरक्षा आव्हान असलेल्या नक्षलवादाच्या (Left Wing Extremism) विरोधातील लढाईत भारताने मे २०२६ मध्ये निर्णायक यश मिळवले आहे. केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत देशाला पूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, जे निर्धारित वेळेत यशस्वी झाले आहे. १८ मे २०२६ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडमधील बस्तर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात ‘भारत आता नक्षलमुक्त झाला आहे’ अशी अधिकृत घोषणा केली. हा विजय केवळ लष्करी कारवाईचा नसून, तो गेल्या दशकातील नियोजनबद्ध रणनीती, आधुनिक तंत्रज्ञान आणि ‘विकास’ या त्रिसूत्रीचा परिणाम आहे.
२०२५ आणि २०२६ च्या सुरुवातीच्या काळातील आकडेवारी या परिवर्तनाची व्याप्ती स्पष्ट करते. २०२५ मध्ये सुरक्षा दलांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ आणि इतर विविध मोहिमांत सुमारे ३१७ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर ८०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली. याच काळात जवळपास २,००० नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली, जे आतापर्यंतचे एका वर्षातील सर्वाधिक प्रमाण आहे. २०१४ मध्ये देशातील १२६ जिल्हे नक्षलग्रस्त होते. ती संख्या २०२५ च्या अखेरीस केवळ ११ वर आली होती आणि २०२६ च्या मे महिन्यापर्यंत हे उरलेले सर्व भाग आता अधिकृतपणे सुरक्षित घोषित करण्यात आले आहेत. नक्षलवादी हिंसेत होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत गेल्या दशकात ८६ टक्क्यांहून अधिक घट झाली असून, सुरक्षा दलांच्या धाडसामुळे एकेकाळी ‘लाल पट्टा’ म्हणून ओळखला जाणारा भूभाग आता शांततेच्या मार्गावर परतला आहे.