

Human-wildlife conflict solutions India
esakal
राज्यभरात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. थेट लोकांच्या घरात शिरून बिबट्याने हल्ले करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मानवी वस्तीतील बिबट्यांचे आक्रमण थांबवणे आव्हानात्मक होऊ लागले आहे. बिबट-मानव संघर्ष धोक्याची घंटा ठरू लागला आहे. बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी वन विभागाला गांभीर्याने विचार करावा लागेल.
कृष्णा, सह्याद्री, अजिंक्यतारा, मरळी, शेडगेवाडी, पाली इत्यादी साखर कारखान्यांमुळे उसाची प्रचंड लागवड झाली आहे. उसाने बिबट्याच्या जवळजवळ सर्व गरजा भागवल्या आहेत. आज जवळपास दोन दशके बिबट्याचे यशस्वी प्रजनन उसाच्या रानात होत आहे. बिबट्याच्या जवळपास तीन ते चार पिढ्या उसात जन्माला आल्या आहेत. त्यांच्या मेंदूत जनुकीय बदल झाले आहेत. बिबट्या नर-मादीने आपल्या जन्माला येणाऱ्या पिलांना उसाचे रान म्हणजेच आपले घर म्हणून त्यांना गर्भात बिंबवले आहे. हा एक जनुकीय बदल आहे. अनेक बिबट्यांना जेरबंद करून वन विभागाने अभयारण्यात वा जंगलात पुन्हा सोडलेही; मात्र त्या बिबट्यांना जंगल हे आपले घर माहीत नाही. ते उसाच्या रानालाच आपले सुरक्षित घर मानतात व पुन्हा तिथेच येतात.