मध्यप्रदेशात मराठी भाषा जोपासली जातेय कारण...
हिंदी भाषेचं अधिराज्य असलेल्या मध्यप्रदेश राज्याची औद्योगिक व आर्थिक राजधानी म्हणून इंदूर शहर ओळखले जाते. शालेय जीवनापासून या शहराविषयी ऐकून होतो. पण, तिथे जाण्याचा योग पत्रकारीतेच्या निमित्ताने जानेवारी २०२२ मध्ये आला. कारण, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात सलग पाच वर्षांपासून इंदूर शहर देशात प्रथम क्रमांक पटकावत आहे. पाच वर्षांपूर्वी जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य असलेल्या इंदूरने काय जादू केली की, स्वच्छतेत देशभर त्याचे गुणगान गायले जात आहे. इंदूर महापालिकेने राबविलेले प्रयोग आपल्या पिंपरी चिंचवड शहरातही राबवू, असा संकल्प सोडत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काही पत्रकारांना इंदूरला पाठवले होते. त्यानिमित्ताने इंदूरला जाण्याचा योग आला.
तेथील अधिकाऱ्यांशी बोलताना, नागरिकांशी संवाद साधताना माय मराठीचे महत्त्व कळले. कारण, इंदूरमध्ये सर्व हिंदी भाषिक आहेत, असे समजून आम्ही त्यांच्याशी हिंदीत बोलत होतो, पण, आम्ही पुणे, पिंपरी-चिंचवड येथील असल्याचे कळल्यावर ते मराठीत बोलत होते. अधिक माहिती घेतल्यावर कळले की त्यांचे घराने मूळचे मराठी आहेत. पण, पेशवाई, मराठेशाहीच्या काळात उत्तरेकडे राज्य विस्तारासाठी निघालेले मराठी सरदार, मावळे इंदूरमध्ये स्थायिक झाले. तेव्हापासून आजपर्यंत अर्थात तीन-साडेतीनशे वर्षांपासून मायमराठीचे जतन त्यांनी केले आहे. करत आहेत. घरांसह सार्वजनिक जीवनातही ते मराठी भाषेचा वापर करत आहेत. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र साहित्य सभा नावाची संस्था इथे कार्यरत असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली. त्या संस्थेशी संबंधित व्यक्तीकडून इंदूर येथील मराठी साहित्यिका शोभा तेलंग आणि प्रफुल्ल कस्तुरे अर्थात कस्तुरे मामा यांचे संपर्क क्रमांक घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला. संस्थेचा पत्ता घेऊन मी तिथे येत असल्याचे सांगितले. त्यांना खूप आनंद झाला. सायंकाळी सातच्या सुमारास संस्थेच्या कार्यालयात पोहोचलो. त्यांचे प्रशस्त ग्रंथालय बघितले. आणि मायमराठीचे महत्व कळले.