'कोरोनाकाळ' मानवी जीवनावर आघात...
एखादी मोठी दुर्घटना घडली की सामुहिक श्रद्धांजली वाहिली जाते, हे सर्वश्रूत आहे. मात्र, कोरोनाकाळात बळी पडलेल्या जीवांना भागवत कथेतून सामुदायिक श्राद्ध ही संकल्पना प्रथमच अनुभवली. भंडारदरा पर्वतरांगांच्या पायथ्यालगतच्या भैरवगडमध्ये असलेल्या ज्ञानेश आश्रमात अनेक कुटुंबातील मंडळींनी सामुदायिक श्राद्धाचा विधी केला. या अनोख्या विधीतून घरातील कुटुंबीयांना निश्चितच मानसिक आधार तर मिळालाच; पण जगण्याची उमेदही मिळाली. गेल्या आठवड्यात काही कामानिमित्त अकोला जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगाच्या सहवासात असलेल्या भैरवगड परिसरात नयनरम्य 'ज्ञानेश' आश्रमात जाण्याचा योग आला.अमरावतीपासून या भागात जाताना तशी रखरख. पण, जसजसा भैरवगड जवळ येऊ लागतो, तेव्हा हाच परिसर अतिशय सुंदर दिसू लागतो. 'ज्ञानेश ' आश्रमात पाऊल ठेवताच तिथे काही कार्यक्रम सुरू असल्याची चाहूल लागली. आत गेल्यावर लक्षात आले, की तेथे भागवत कथा सप्ताह सुरू होता.