धरण, पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाचं आपापल्या भागातील धरणाकडं लक्ष असतं. ते किती भरलं, कधी भरेलं? हे जाणून घेण्यासाठी दररोज त्याचे अपडेट्स घेत असतो. कारण, त्यातूनच तर वर्षभर पिण्यासाठी, शेती आणि औद्योगिक क्षेत्रासाठी गरज पूर्ण होते. मग, तुम्हाला माहितीये का या धरणांचा इतिहास किती पुरातन आहे ते. चला जाणून घेऊयात.
प्राचीन काळात इजिप्त अन् चीनमध्ये धरणं बांधली गेली. इ.स.पूर्व 2900 च्या सुमारास नाईल नदीवरील कोशेस याठिकाणी धरण बांधण्यात आलं. त्याची उंची 15 मीटर असून, ते सर्वांत प्राचीन मानलं जातं. इ.स.पूर्व 2700 मध्ये त्याच नदीवर बांधलेल्या 'साद एल काफारा' या दगडी धरणाचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत. याशिवाय भारतात इ.स. 500-1800 या काळात अनेक मातीची धरणं बांधली गेली.
1869 मध्ये पुणे शहराजवळ खडकवासला येथे पहिलं मोठं दगडी धरण बांधलं गेलं. पाणी अन् जमिनीची धूप थांबावी म्हणून रोमन लोकांनी इटली, उत्तर आफ्रिका व स्पेनमध्ये दगडी धरणं बांधली. तसंच, चौदाव्या शतकात इराणमध्ये पहिलं केबर नावाचं कमानी धरण बांधलं. दरम्यान, 1960मध्ये भारतात हरित क्रांतीची सुरुवात झाल्यानं पाण्याची गरज वाढली. त्याच सुमारास उद्योगही सुरू झाले अन् जलउर्जेची मागणी वाढली. 2006मध्ये चार हजार 50 धरणं पूर्ण, तर 475 धरणांचं बांधकाम चालू होतं. यामुळेचं 1950 ते 1993मध्ये भारत हा वर्ल्ड बँकेकडून सर्वांत जास्त कर्ज काढणारा देश ठरला. हा झाला धरणांचा इतिहास. आता भारतातील टॉप 10 महाकाय धरणांबद्दल जाणून घेऊयात.