इरावती बारसोडे
नवं वर्ष आलं, असं म्हणता म्हणता नव्या वर्षाचा एक महिना सरलासुद्धा. २०२३ची अनेक घटनांसाठी इतिहासात नोंद झाली.
हवामानाच्या इतिहासातसुद्धा २०२३ची नोंद होणार आहे, कारण २०२३ हे आत्तापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे.
१८५०पासून हवामानाच्या नोंदी आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि नोंदींनुसार गेली काही वर्षं सातत्यानं उष्ण वर्षं म्हणून नोंदवली जातायत.
सन २०२३मध्ये पृथ्वीचं जागतिक सरासरी तापमान १.४८ अंश सेल्सिअसनं अधिक नोंदवलं गेलंय.
तापमानवाढ दीड अंश सेल्सिअसपर्यंत रोखायची असं २०१५च्या पॅरिस करारामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरवलं गेलं होतं.
सध्याची तापमानवाढ बघता आपण ते ध्येय कसं गाठणार? अशी चिंता साहजिकच व्यक्त होतीये.
२०२३ या वर्षात तापमानवाढीच्या बाबतीत काही नवीन ‘विक्रम’ झाले आहेत. एक लाख वर्षांमधलं २०२३ हे सर्वात उष्ण वर्ष असल्याची शक्यता युरोपीयन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसनं (सी३एस) व्यक्त केली आहे.
तापमानवाढीला कारणीभूत असलेला प्रमुख घटक म्हणजे, कार्बन डायऑक्साइडसह इतर हरितवायूंचं उत्सर्जन.
गेल्या वर्षी कर्ब उत्सर्जनही प्रचंड उच्च पातळीला होतं. जागतिक पातळीवर कोळसा, तेल आणि गॅसच्या ज्वलनातून झालेल्या कर्ब उत्सर्जनाची विक्रमी नोंद झाली आहे.
या वर्षातल्या प्रत्येक दिवसाचं तापमान सरासरी तापमानापेक्षा १ अंश जास्त नोंदवलं गेलं. हे पहिल्यांदाच घडलं आहे.
जगात सगळीकडेच या तापमानवाढीचे परिणाम जाणवत आहेत. हवामान बदलांमुळं हवामानासंबंधीच्या तीव्र घटनांमध्ये वाढ होत आहे.
कुठं थंडीच्या किंवा उष्णतेच्या लाटा, कुठं अतिवृष्टी, तर कुठं वणवे माणसाच्या दैनंदिन आयुष्यातली आव्हानं वाढवत आहेत.
अमेरिकेच्या जवळपास दोन तृतीयांश भागामध्ये तीव्र हिवाळा अनुभवायला मिळाला. काही ठिकाणी तर थंडी अक्षरशः जीवघेणी ठरली. आयोवामधील निकोलस सिटीमध्ये उणे २८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
अमेरिकेत थंडीमुळं जवळजवळ नव्वदजणांना प्राण गमवावे लागलेत. पूर्व युरोपातील काही भाग, जर्मनीमध्ये अतिबर्फवृष्टी आणि थंडीमुळं वीज जाणं, शाळा बंद होणं, विमानतळांची उड्डाणं रद्द होणं अशा अनेक समस्या उभ्या राहिल्या होत्या.
वायव्य चीनमधल्या तुल्हे गावात तर उणे ४४.८ अंश असं विक्रमी निचांकी तापमान नोंदवलं गेलं. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा नोंदवल्या गेल्या. ऑस्ट्रेलियामध्ये जास्त तापमानामुळं वणवे पेटण्याची भीती कायमच असते.
तीव्र तापमानामुळे हा धोका आणखी वाढतो. भारतामध्येही तापमानवाढीचे परिणाम जाणवतायत. उत्तर भारतामध्ये हिमालयीन भागामध्ये यंदा बर्फवृष्टी फारशी झालीच नाही.
तापमानातही नेहमीपेक्षा जास्त वाढ झाली होती. तर, त्याउलट दिल्लीसारख्या काही भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त थंडी जाणवली.
हवामानात बदल
होऊन तापमान वाढतंय याचा हा आणखी एक सबळ पुरावा. २०२३ उष्ण ठरलं याचं एक कारण मानवनिर्मित तापमानवाढ हे होतंच, त्याचप्रमाणे या वर्षात एल निनोचा प्रभाव होता. गेल्या मेमध्ये सुरू झालेला एल निनोचा प्रभाव अजूनही जाणवतो आहे.
हा प्रभाव फेब्रुवारीनंतर कमी होईल, असं तज्ज्ञ म्हणतायत. जूनपर्यंत एल निनो पूर्ण निवळेल. एल निनोचा भारताच्या हवामानावर काय परिणाम होणार, तर यंदाच्या उन्हाळ्यात आपली तगमग आणखी वाढणार आहे. यावर्षीचा उन्हाळा नेहमीपेक्षा जास्त कडक असेल, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
पण जूननंतर एल निनोचा प्रभाव कमी होणार असल्यामुळे मॉन्सूनवर त्याची छाया कदाचित नसेल, असा दिलासाही त्यांनी आहे. यंदाचा उन्हाळा कसा असेल, याचा नेमका अंदाज मार्चअखेरीस जाहीर होईलच, पण एकदंरीत हवामानचं बदलतं रंगरूप पाहता आपल्याला आता बेफिकीर राहून चालणार नाही!
-------------------------
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.