पूजा सामंत
‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’, ‘क्वीन’, ‘तनू वेड्स मनू’, ‘लाईफ इन मेट्रो’, ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झाँसी’ अशा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री कंगना रणौत आता निर्मातीच्या भूमिकेत शिरली आहे. ओटीटीवर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘टिकू वेड्स शेरू’ या रॉमकॉम चित्रपटाची निर्मिती कंगनाने केली आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन साई कबीर यांनी केले आहे. ‘मणिकर्णिका’ या आपल्या होम प्रॉडक्शन बॅनरतर्फे कंगनाने या सिनेमाची निर्मिती केली आहे. त्यानिमित्त कंगनाबरोबर झालेल्या गप्पा...
अभिनेत्री म्हणून दमदार कारकीर्द सुरू असताना निर्माती व्हावेसे का वाटले?
कंगना रणौत ः अभिनेत्री असले तरी मी निर्माती का बरं होऊ नये? अनेक कलाकार निर्माते असतात, अगदी दिग्दर्शकदेखील असतात. बॉलिवूडमधील अशा कलाकारांची यादी बरीच मोठी आहे. निर्मिती, दिग्दर्शनापासून वितरणापर्यंत अनेक जबाबदाऱ्या सांभाळलेले कलावंत आपल्याकडे आहेत. ‘मणिकर्णिका फिल्म्स’ हे माझे बॅनर आहेच. म्हणून मी हा एक प्रयत्न केलाय.
तू निर्मिती करत असलेल्या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसारखा उत्तम अभिनेता शरूच्या मध्यवर्ती भूमिकेत आहे. मग नायिकेची भूमिका स्वतः करावी असे वाटले नाही?
कंगना रणौत : मला अजिबातच असा मोह झाला नाही. माझ्या निर्मितीतील हा चित्रपट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईलच मी असे का म्हणतेय ते. नवाजुद्दीनची सहकलाकार म्हणून एका अतिशय तरुण, सुंदर नायिकेची गरज होती. कथानकात एका तरुण अभिनेत्रीची गरज असताना मी निर्माती असल्याने स्वतः नायिका होण्याचा अट्टाहास का करावा?
अनेक महिने आम्ही एका टिनएजर, सुंदर मुलीच्या शोधात होतो. शेवटी अवनीत कौर या नवोदित अभिनेत्रीची भेट झाली आणि एकदाचा चित्रपट पुढे सुरू झाला. या चित्रपटातली नायिका भोळीभाबडी, साधीसुधी आहे. तिला व्यवहार, जगरहाटी यांचा अजून फारसा परिचय नाही. जगाविषयी अनभिज्ञ असणारी अशी ही नायिका आहे. आणि माझ्या मते, बॉलिवूडला नव्या-फ्रेश चेहऱ्यांची नितांत आवश्यकता आहे. मग नवोदितांना संधी का देऊ नये?
अनेक जण बऱ्याचदा निर्मितीबरोबर दिग्दर्शनही करतात. स्वतः दिग्दर्शन करावे असे वाटले नाही का?
कंगना रणौत ः नाही! मला दिग्दर्शक म्हणून स्वतःला अजून सिद्ध करायचे आहे, आणि त्यासाठी बराच काळ जावा लागेल. खुद को काबिल बनाने के लिये वक्त चाहिये। कोई जल्दी नहीं है मुझे। शिवाय हा प्रोजेक्ट कबीरचा होता. त्याच्या प्रोजेक्टला तोच योग्य न्याय देऊ शकतो.
तुझा हा सिनेमा मनोरंजनाखेरीज काही संदेशही देतो का? हल्ली घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घटस्फोट न घेता प्रेमाने तडजोडी करा, असा छुपा संदेश यातून मिळतो असे ऐकले आहे.
कंगना रणौत ः हल्ली दोन पिढ्यांमधील विचार सारखे बदलतात. त्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो. त्याचप्रमाणे प्रेक्षकांची आताची पिढी आणि दहा वर्षांपूर्वीची पिढी यातही जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. आताचा प्रेक्षक संगणक आणि सोशल मीडिया काळातला ‘स्मार्ट’ प्रेक्षक आहे.
त्यामुळे माझे मत असे आहे की आजच्या काळातील स्मार्ट प्रेक्षकाला संदेश वगैरे नको आहे, फक्त रिलेव्हंट वाटेल, त्यांच्या बुद्धीला पटेल असे मनोरंजन हवे आहे. मला असे ही वाटते, की आजच्या काळात आपण यशाची व्याख्या वेगळ्या पद्धतीने करतो. एखाद्या व्यक्तीकडे किती पैसाअडका आहे, मालमत्ता किती आहे यावरून ती व्यक्ती यशस्वी आहे की नाही ते ठरते. मग त्या व्यक्तीने पैसा कसा मिळवला, हा प्रश्न गौण असतो. जी व्यक्ती अपयशी ठरते तिच्याकडे आपण ती अपराधी असल्यासारखे पाहतो.
अपयशी व्यक्तीला आपल्या समाजात शून्य किंमत आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे समजण्याची परिपक्वता आपल्याकडे कधी येणार? अपयशाच्या अनेक पायऱ्यांनंतर यशाचा सूर गवसतो आणि यशाचे महत्त्व अधोरेखित होते. म्हणूनच मला मेसेज ओरिएन्टेड फिल्म आवडत नाहीत. कुठल्याही चित्रपटात एखादी व्यक्तिरेखा तरी अशी असते जी आपल्याला भावते, आपण त्या व्यक्तिरेखेशी रिलेट करतो... हाच संदेश समजावा. घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे हे सत्य आहे, पण चित्रपटामध्ये अशाप्रकारचा काही सामाजिक संदेश नाही.
नवाजुद्दीन सिद्दीकीशी भेट कधी झाली?
कंगना रणौत : नवाझ एक गुणी अभिनेता आहे, हे त्याचे अनेक चित्रपट पाहून ध्यानात आलेच होते. पण माझ्या या सिनेमासाठी माझी आणि नवाझची भेट बंगळूरमध्ये झाली. त्याने कथा ऐकताच होकार दिला.
तुझ्या या चित्रपटात नायिकेवर लग्न करण्याचा दबाव असतो. तुझ्या आई-वडिलांनी तुझ्यावर कधी लग्नासाठी दबाव आणलाय?
कंगना रणौत : आजही समाजात मुली वीसेक वर्षांच्या झाल्या की त्यांनी ‘वेळेत’ लग्न करावे हा दबाव त्यांच्यावर असतोच. पंचविशीच्या पुढे मुलींसाठी लग्नाचे वय उलटून गेले हा (गैर)समज दुर्दैवाने अजूनही कायम आहे. माझी आई माझ्यावर नेहमी दडपण आणत असते. मी फटकळ आहे,
मनातल्या भावना लगेच व्यक्त करते; त्यामुळे मला चांगला मुलगा मिळणार नाही, असे तिला वाटते. माझ्यासाठी परमेश्वराने योग्य जोडीदार ठेवलाच असेल, फक्त ती वेळ अजून यायची आहे! मला लग्न करण्याची घाई नाहीये, कारण माझ्या करिअरमध्ये मी खूप समाधानी आहे. त्यामुळे जीवनात बाकी काही उणीव जाणवतच नाही.
तुला बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हटले जाते. पण शाहरुख, सलमान, आमीर यांच्याबरोबर तुझे चित्रपट नाहीत...
कंगना रणौत ः मला याचे काहीच सोयरसुतक नाही. ज्या चित्रपटांमध्ये सशक्त स्त्रीकेंद्री भूमिका नसतात, ते चित्रपट मी स्वीकारत नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.