

Role of Fragrance in Pollination
esakal
डॉ. मंदार दातार
ऑर्किड्सच्या अफाट विविधतेमागच्या अचाट करामतीचं कारण आहे, त्यांनी वापरलेल्या परागीभवनाच्या अत्यंत विशेष, अनेकदा थक्क करणाऱ्या पद्धती. या विविध युक्त्या, क्लृप्त्यांमागचा ‘मास्टर माइंड’ आहे सुगंध. कोट्यवधी वर्षांत उत्क्रांतीनं या फुलाला साधी गोष्ट शिकवली आहे, योग्य वेळी फुलणं हे योग्य फूल असण्याइतकंच महत्त्वाचं आहे.
उन्हाळ्याच्या अखेरीस वळवाच्या पहिल्या पावसाचे थेंब कोरड्या शुष्क जमिनीवर पडतात अन् तत्क्षणी जमिनीतून एक चिरपरिचित, आदिम सुगंध बाहेर पडतो तो म्हणजे मृद्गंध... सगळ्यांनाच भावणारा, कवितांचा विषय असणारा हा परिमळ येतो मातीमध्ये असणाऱ्या स्ट्रेप्टोमायसेस नावाच्या जीवाणूंमुळे. हे जीवाणू रसायनांचा गंधित रेणू तयार करतात, त्याला ‘जिओस्मिन’ म्हटलं जातं. याच गंधाला इंग्रजीत ‘पेट्रिकोर’ म्हणतात. हा गंध माणसाला का बरं इतका प्रिय आहे? याचं कारण दडलं आहे आपल्या उत्क्रांतीत. आपली घ्राणेंद्रियं या रेणूला अत्यंत संवेदनशील आहेत. हवेत एक कोटी कणांमध्ये एक भाग हा मृद्गंध असला, तरी तो आपल्याला जाणवू शकतो. पाणी ही भोवतालच्या सजीवसृष्टीसाठीच नाही, तर माणसासाठीही सर्वात महत्त्वाची गोष्ट. पावसाळा जीवनदायी पाणी घेऊन येत आहे, या संदेशाची ही मृद्गंधरूपी आदिम आठवण उत्क्रांतीच्या लाखो वर्षांत आपल्या स्वागतशील मेंदूत खोलवर रुजलेली आहे.
पण हवाहवासा गंध निर्माण करणं ही कामगिरी निसर्गातील इतर घटकापेक्षा वनस्पतींनी जास्त निगुतीनं पार पाडली. आज गुलाब, केवडा, मोगरा, निशिगंध यांसारखी अत्तरं आपण स्वतःची आयुष्यं सुखकर करायला वापरत असलो, तरी मुळात वनस्पतींनी हे गंध माणसासाठी तयार केलेच नाहीत. फुलांनी सुगंध निर्माण करून त्या सुगंधाचा उपयोग केला तो एक संदेश म्हणून. सुगंधाचं हे पत्र ज्यांच्यासाठी लिहिलं आहे त्या मधमाश्या, फुलपाखरं, पतंग यांसारखे परागवाहक हे पत्र अगदी आवर्जून वाचतील अशी खात्री बाळगूनच. ग़ालिब साहेब म्हणतात -