लेखक : राजाराम पानगव्हाणे
आपल्या लोकशाहीचा प्राण धर्मनिरपेक्षतेत आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे देशाचा कारभार धर्माधिष्ठित नसेल. देशात सर्व धर्मांना समान वागणूक मिळेल व त्यांचा समान आदर केला जाईल.
भारतातील प्रत्येकाला स्वधर्माचे आचरण करण्याचे ‘स्वातंत्र्य’ असेल, याला सर्वधर्मसमभाव म्हणतात. मात्र, समाजात पैसा, चंगळवाद वाढल्याने काही घटक असहिष्णुता, अशांत व अमानुष बनत आहेत.
याची उदाहरणे समाजात नित्य दिसतात. या अनागोंदीवर स्वातंत्र्य, समता, बंधुता व सर्वधर्मसमभाव याची सतत जाणीव करून देण्यासाठी प्रजासत्ताक दिन हे त्यासाठीचे एक निमित्त ठरू शकेल!
(saptarang latest marathi article by rajaram pangavane on Republic Day One reason many senses nashik news)
भारत हा जगातील सर्वांत बलवान लोकशाही असलेला देश आहे. आपल्या देशाचा राज्यकारभार ज्या नियम, कायद्यानुसार चालतो ते म्हणजे आपले संविधान, भारताची राज्यघटना. सर्वसमावेशक व सर्वन्यायी राज्यघटनेमुळेच भारताची जगात वेगळी ओळख आहे.
भारताचे पहिले राष्ट्रपती व संविधान समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद, मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीच्या सदस्यांनी रात्रंदिवस एक करून आपल्याला हे संविधान दिले आहे.
डॉ. आंबेडकरांचे घटनानिर्मितीत विशेष योगदान असल्याने त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनही संबोधले जाते. प्रत्येक नागरिकाच्या घरात हे संविधान असायलाच हवे. आपला सगळा जीवनप्रवास संविधानाने दाखविलेल्या मार्गानेच पूर्ण होणार आहे.
२६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आगामी आठवड्यात आहे. या संविधान दिनानिमित्त आपण आपल्या संविधानाविषयी जाणून घेऊया. खरे तर संविधानाच्या उद्देशिकेतच संविधानाचा संपूर्ण सार आहे.
न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता यावर आधारित आपले संविधान आहे. भारतीय संविधानात २२ भाग (प्रकरण), १२ अनुसूची व दोन परिशिष्ट आहेत. संविधानाची सुरवात उद्देशिकेने होते.
स्वातंत्र्य, मूलभूत हक्क, कर्तव्ये, समता, न्याय, लोकशाही, बंधुता ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट व्हावी, असा संविधान निर्मात्यांचा उद्देश आहे.
भारतीय संविधानाच्या ‘या’ खास गोष्टी प्रत्येक देशवासीयांना माहिती असणे गरजेचे आहे. २६ जानेवारी १९५० ला भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. पण, याआधी २६ नोव्हेंबर १९४९ ला पहिल्यांदाच औपचारिकपणे स्वीकारण्यात आली.
भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये
- भारतीय राज्यघटना हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये लिहिली गेली आहे.
- भारतीय संविधान बनविण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले.
- भारतीय राज्यघटनेच्या इंग्रजी आवृत्तीत एकूण एक लाख १७ हजार ३६९ शब्द आहेत.
- भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत हाताने लिहिलेली आहे. भारताचे संविधान प्रेमबिहारी नारायण रायजादा (कॅलिग्राफर) यांनी इटॅलिक शैलीत लिहिले आहे.
- भारतीय राज्यघटनेचे प्रत्येक पान शांतिनिकेतनच्या कलाकारांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन चित्ररूपात प्रत्येक पानावर रेखाटले आहे.
- भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत हिलियम वायूने भरलेल्या काचेच्या पेटीत भारतीय संसद भवनाच्या सेंट्रल लायब्ररीमध्ये अतिशय सुरक्षित आणि अनुकूल.
सामाजिक न्याय हा गाभा...
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री जगाला फ्रेंच राज्यक्रांतीतून मिळाली असली, तरी भारतीयांना ही मूल्ये नवी नाहीत. ज्ञानेश्वरांनी गीतेचे रसग्रहण करून सर्वसामान्यांसाठी मायमराठीत भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) लिहिली. स्वातंत्र्य, समता व बंधुता यांच्याशी संबंधित मूलभूत विचार त्यात मांडलेला दिसतो.
सामाजिक न्याय हे उद्दिष्ट संविधानाच्या प्रतिज्ञापत्रकात तसेच मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्त्वे यात समाविष्ट आहेत. नवीन समाज हा न्यायावर आधारलेला असावा, ही जाणीव स्वातंत्र्य चळवळीपासून भारतीय जनतेत दृढमूल झाली.
मालमत्तेचे वाटप न्याय्य पद्धतीने व्हावे, उत्पादनाची साधने फक्त थोड्या लोकांच्या हाती राहू नयेत, सर्वांना समान वेतन मिळावे, स्त्रिया व मुले यांचे हितसंबंध सुरक्षित राहावेत, समाजातल्या दुबळ्या गटांना वर येण्याची संधी मिळावी, ही ती तत्त्वे होत. सामाजिक व आर्षिक विषमता कमी व्हावी, ही त्यामागची प्रमुख प्रेरणा होय.
मूलभूत अधिकार : घटनेचा आत्मा
राज्यघटनेतील महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक म्हणजे मूलभूत अधिकार. घटनेने प्रत्येक व्यक्तीला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्यांच्या त्या अधिकारांवर गदा आणता कामा नये.
प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांना शासनाच्या सत्तेपासून अबाधित ठेवायचे, बहुमतावर नियंत्रण ठेवणे व बहुमताने त्यांना मर्यादा पडणार नाही याची निश्चिती असणे. या मूलभूत अधिकारांना शासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच कायद्याने निर्माण केलेल्या विद्यापीठांसारख्या संस्था उल्लंघू शकत नाहीत.
(१३) मूलभूत अधिकारांचा संकोच झाला असता, सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याचाही मूलभूत अधिकार आहे. न्यायालयांचे संरक्षण असल्याशिवाय मूलभूत अधिकाराला अर्थ नसतो, म्हणूनच ही तरतूद करण्यात आली. या तरतुदीचे वर्णन डॉ. भीमराव आंबेडकर यांनी ‘घटनेचा आत्मा’ या शब्दांत केले होते.
अधिकार आणि कर्तव्ये
मूलभूत अधिकारांबरोबर प्रत्येक नागरिकाला काही कर्तव्येही पाळायचे आहेत.
(अ) संविधानाप्रमाणे वर्तन करणे, संविधानाचा तसेच त्याच्या आदर्शांचा व त्याने निर्माण केलेल्या संस्थांचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.
(आ) स्वातंत्र्य मूल्याला प्रेरक असलेल्या आदर्शांचे संवर्धन करणे आणि ती अनुसरणे.
(इ) देशाचे सार्वभौमत्व, एकता व एकसंधता यांचा परिपोष व रक्षण करणे.
(ई) देशाचे संरक्षण करणे व वेळ आल्यास राष्ट्रसेवेत समाविष्ट होणे.
(उ) विविध धर्मीय, भाषिक तसेच वांशिक लोकांमध्ये बंधुत्वाची भावना दृढ करणे तसेच रूढीच्या प्रतिष्ठेस बाधा आणणाऱ्या चालीरीतींचा त्याग करणे.
(ऊ) जंगले, उद्याने, नद्या आणि वन्यजीवन यांसारख्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करणे व ती वाढीस लावणे आणि सर्व प्राणिमात्रांबाबत दयाभाव बाळगणे.
(ए) शास्त्रीय दृष्टिकोन, मानवतावादी भूमिका व चौकस तसेच सुधारणावादी दृष्टिकोन यांचा परिपोष करणे.
(ऐ) राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचार निषिद्ध मानणे.
(ओ) वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रांत प्रगती साधून देशाच्या प्रगतीस हातभार लावणे.
मार्गदर्शक तत्त्वे : वैशिष्ट्यपूर्ण अंग
मूलभूत तत्त्वांबरोबर संविधानाच्या चौथ्या प्रकरणात मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत. संविधानाचे हे वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. शासनाला धोरण ठरविताना ही तत्त्वे मार्गदर्शक ठरावीत, हा घटनाकारांचा त्यामागे हेतू होता.
भारतात आर्थिक व सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना करणे, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या तत्त्वानुसार कायदे करून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी शासनावर आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘गौतम बुद्धांच्या शिकवणीचे सत्यस्वरूप प्रज्ञा, शील व करुणा या त्रिशिक्षापदावर आधारलेले आहे. माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे. या आवश्यकतेतून नीतीचा जन्म होतो.
ही नीतिमत्ता सार्वत्रिक असून, ती प्रबलांपासून दुर्बलांचे रक्षण करणारी, सर्वसामान्य आदर्श मूल्यमापनाचे मानदंड आणि नियम घालून देणारी व माणसांच्या विकासाला हातभार लावणारी असावी. तिच्यामुळे स्वातंत्र्य आणि समता परिणामकारक बनतात.
जीवनमूल्यांचे पालन हवेच
लोकशाहीस सामाजिक आणि आर्थिक समतेचे अधिष्ठान असावे. म्हणून स्वातंत्र्य, समता व बंधुता या उदात्त जीवनमूल्यांची फारकत करता कामा नये. समता नसेल तर मूठभर लोक इतरांवर सत्ता गाजवतील.
समता असेल व स्वातंत्र्य नसेल तर व्यक्तीची उपक्रमशीलता नष्ट होईल आणि बंधुभाव नसेल तर दुहीमुळे स्वातंत्र्य व समता धोक्यात येईल. लोकशाही ही केवळ राज्यपद्धती नाही, तर ती उदात्त जीवनपद्धती आहे. म्हणून या तिन्ही जीवनमूल्यांचे पालन केले पाहिजे.
(लेखक ब्रह्मा व्हॅली स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.