

Naxalism Internal Security Challenge India 2026
esakal
बालाजी श्रीवास्तव - sakal.avtaran@gmail.com
सहा दशकांपासून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठे आव्हान ठरलेला नक्षलवाद आता अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. सुरक्षा, विकास आणि पुनर्वसन यांच्या त्रिसूत्रीने ‘रेड कॉरिडॉर’चा अस्त होऊन ‘नक्षलमुक्त भारता’चे ध्येय आता वास्तवाच्या जवळ पोहोचले आहे.
जवळपास साठ वर्षे एका सशस्त्र बंडाने भारताचा गाभा पोखरला. माओवाद्यांनी ‘जनयुद्धा’ची घोषणा केली होती आणि भारताच्या घनदाट जंगलांमध्ये ते आपले समांतर सरकार चालवत होते. ते कर वसूल करत, स्वतःच्या पद्धतीचा न्यायनिवाडा करत आणि संविधानाशी एकनिष्ठ असलेल्यांवर हल्ले करत... पूर्वीचे शासकीय प्रतिसाद एक तर कुचकामी ठरले किंवा अपुरे पडले. आता तो प्रदीर्घ आणि काळा अध्याय संपत आहे. ‘नक्षलमुक्त भारता’चे ध्येय आता आवाक्यात आहे.
‘नक्षलमुक्त भारत’ चळवळीचा विस्तार चिंताजनक होता. १९६७ मध्ये पश्चिम बंगालमधील नक्षलबारीमध्ये पडलेली ठिणगी एका मोठ्या बंडाच्या रूपाने आंध्र प्रदेश, बिहार, ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि झारखंडच्या आदिवासी पट्ट्यात पसरली. २००४ मध्ये ‘सीपीआय (माओवादी)’च्या स्थापनेमुळे विविध गट एका छत्राखाली आले, २०१० पर्यंत ९६ जिल्ह्यांमध्ये हिंसाचार दिसत होता आणि १२६ जिल्ह्यांना नक्षलग्रस्त मानले जात होते. सुमारे १२ कोटी भारतीय एका समांतर सशस्त्र व्यवस्थेखाली जगत होते. भारताच्या एक-पंचमांश भागावर ‘रेड कॉरिडॉर’ निर्माण करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न हे देशापुढील सर्वात गंभीर अंतर्गत सुरक्षा आव्हान होते.