
पुणे : ‘‘महिलांवरील अत्याचारांच्या सलग घडलेल्या घटनांची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत आरोपींना अटकही केली. मात्र, हा केवळ तात्पुरत्या कारवाईचा विषय नाही, त्यावर दीर्घकालीन उपाययोजनेची गरज आहे. त्यामुळे या प्रश्नावर महापालिका, रेल्वे, प्रादेशिक परिवहन अशा सगळ्याच विभागांशी संपर्क साधून आम्ही कायमस्वरूपी उपाययोजनांचा आराखडा तयार करीत आहोत. पुढील तीन महिन्यांत त्याचे परिणाम दिसू लागतील,’’ असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने गुप्ता यांच्याशी वार्तालाप आयोजित केला होता. या वेळी संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस डॉ. सुजित तांबडे उपस्थित होते. महिला अत्याचारांच्या घटनांबाबत गुप्ता म्हणाले, ‘‘अल्पवयीन मुलीचा कसून शोध घेतला, तिला परत आणून विश्वासात घेत गुन्हा दाखल केला. आरोपींनाही अटक केली. त्याचबरोबर दुसऱ्या घटनेतील आरोपीचाही तत्काळ शोध घेतला. या घटना सलग घडल्या, त्याची सखोलता तपासली. त्यानंतर कारवाई केली. परंतु या घटना रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना गरजेच्या आहेत. त्यासाठी आम्ही स्वतः महापालिका, रेल्वे खाते, पीएमपीएमएल, आरटीओ यांच्याशी बैठक घेतल्या.’’ सूत्रसंचालन नवनाथ शिंदे यांनी केले.
रिक्षा व्यवसायातील गुन्हेगारीवर कारवाई
शहरातील बलात्काराच्या घटनांमधील बहुतांश आरोपी हे रिक्षाचालक असल्याचे निष्पन्न झाले होते. शहरात रिक्षाचालकांकडून एकापाठोपाठ एक गुन्हे घडल्यानंतर रिक्षा व्यवसायात काही गुन्हेगारी वृत्तीचे लोक शिरले आहेत. ही गुन्हेगारी प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी पावले उचलली जातील. येत्या तीन महिन्यांतच हे चित्र अनुभवास येईल, असेही गुप्ता यांनी सांगितले.
ई-चलन थांबवेल लपवाछपवी
वाहतूक पोलिस नियमन करण्यापेक्षा चौकात, रस्त्याच्या बाजूला छुप्या पद्धतीने उभे राहून वाहनचालकांवर कारवाई करतात. या प्रकाराची आम्हीही दखल घेतली असून त्यावर ॲटोमॅटिक ई-चलन’ हा चांगला पर्याय ठरू शकेल. त्यामुळे नागरीकांना अडविण्याची गरज पडणार नाही आणि गैरप्रकारही थांबतील, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
गर्दीवर नियंत्रणासाठी प्रयत्न
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी रस्ते बंद केले जात आहेत. त्याचबरोबर संबंधित रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने वाहतूकही कशी सुरू राहील, यावरही लक्ष दिले जात असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
कारवायांवरही बारकाईने लक्ष
गुन्हे, अवैध धंद्यावर नियंत्रण आणतानाच आम्ही महिला सुरक्षितता आणि दहशतवाद रोखण्यासही सर्वाधिक प्राधान्य देत आहोत. विविध प्रकारच्या घटना घडू नयेत, यादृष्टीने पोलिसांचे विविध विभाग कार्यरत असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले.