एआय परिषदेवरून प्रशासनाची खरडपट्टी

एआय परिषदेवरून प्रशासनाची खरडपट्टी
Published on

‘एआय’ परिषदेवरून प्रशासनाची खरडपट्टी

पाच कोटींच्या खर्चावरून कृषिमंत्री भरणेंकडून विचारणा

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई ः ‘एआय फाॅर ॲग्री’ या कृषी विभागाच्या परिषदेत पाच कोटी रुपयांच्या खर्चावरून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रभारी सीईओ श्रीकांत आंडगे यांची खरडपट्टी काढली. ‘‘आगामी अधिवेशनात या प्रश्नावर आम्ही उत्तरे देणार नाही. जे होईल त्याला सामोरे जा,’’ असा इशारा दिला.
दरम्यान, कृषी सचिव परिमल सिंग यांनी ‘सध्या आपल्यासमोर एल निनो आणि आर्थिक संकटामुळे इंधन तुटवड्याचे मोठे संकट आहे, त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे,’ असे सांगत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यासाठी राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील ऊस पिकासह फळपिके आणि खरिपातील पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उत्पादन खर्च कमी करत उत्पादन वाढविण्यासाठी माॅडेल विकसित करणे, तसेच कृषी विद्यापीठांतील इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. मात्र, या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नावीन्यता केंद्रासाठी सीईओ न नेमता उपसचिव आंडगे यांच्याकडे कार्यभार देण्यात आला आहे.
अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बांद्रा कुर्ला काॅम्पलेक्स येथील जिओ कन्व्हेशन सेंटर येथे एआय फाॅर ॲग्री ही जंगी परिषद घेतली. या परिषदेसाठी पाच कोटी रुपयांचा खर्च झाल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. तसेच केवळ दोन कोटी रुपयांचे ऑडिट केले असून उर्वरित ३ कोटी रुपयांचे ऑडिट केलेले नाही. शिवाय एका वेळच्या जेवणावर ५२ लाख ४९ हजार रुपये खर्च केले आहेत. तसेच जेवणासाठी प्रति व्यक्ती किती खर्च करण्यात आला याची माहिती देण्यात आलेली नाही. शिवाय परिषदेत केलेले करार कोणत्याही व्यावसायिक बंधनाशिवाय केले गेले. या गंभीर बाबी कृषिमंत्री भरणे यांनी मांडत अहवाल देण्याची सूचना केली. तसेच या सर्व बाबींवर विधिमंडळात चर्चा झाली तर मी पाठराखण करणार नाही, असा दम दिला.
दरम्यान, कृषी सचिव परिमल सिंग आणि उपसचिव आंडगे यांच्याकडून या परिषदेत झालेल्या कामाची माहिती देण्याचा प्रयत्न झाला. केवळ खर्चाची बाजू न पाहता या परिषदेत जगभरातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. तसेच करण्यात आलेल्या करारांचा कृषी क्षेत्राला फायदा होईल, असे सांगण्यात आले.


आगामी संकट मोठे
कृषी सचिव परिमल सिंग यांनी या बैठकीत खत तुटवडा आणि ‘एल निनो’बाबत गंभीर चिंता व्यक्त केली. खताचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. तसेच एल निनोचा प्रभाव जाणवला तर आगामी संकट अकल्पित मोठे असेल अशी भीती व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com