वारजे माळवाडी : राज्यात असलेल्या शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कारभाराला जनता वैतागली असल्याने या सरकारच्या विरुध्दचा संताप पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत व्यक्त झाला. अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पुण्यात व्यक्त केली.
भाजपाचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार समाधान आवताडे यांचे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे विजयाबद्दल आमदार चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले. आमदार प्रशांत परिचारक आणि उमेश परिचारक यांनी एकदिलाने भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांना साथ दिल्याने विजय मिळण्यास हातभार लागला. मतदारांचे आभार मानून ते म्हणाले की, लोकांच्या मनात राज्यातील आघाडी सरकारबद्दल राग, रोष व अस्वथता आहे. संधी मिळेल तेथे लोक तो व्यक्त करीत आहेत. यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीतही साडे चौदा हजार पैकी सहा हजार ग्रामपंचायतीत भाजपाचे सरपंच आहेत. महाविकास आघाडी सरकारवरील लोकांचा विश्वास उडाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत. हे नेतृत्व फेल गेले आहे. हा या पोटनिवडणुकीतील जनतेच्या कौल आहे. सरकारच्या विरुद्ध फेल गेल्याची मोठी यादी आहे. त्या मध्ये विजेची कनेक्शन कापणे, वेगवेगळी नुकसान भरपाई खात्यात जमा नाही, शेतकऱ्यांना मदत नाही, पीक विम्याचा लाभ नाही, कोविडच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांना पॅकेज नाही, तुटपुंजे पॅकेज दिले त्याची अंमलबजावणी नाही, अशा अनेक प्रश्नांनी लोक हैराण झाले आहेत. लोक निवडणुकीची वाट पाहत होते. ही पोटनिवडणूक म्हणजे लिटमस टेस्ट झाली.
या विजयाबद्दल त्यांनी परिचारक यांचेही अभिनंदन करून आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीला संघटित शक्तीतून हा विजय मिळाला. पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन त्यांना दिलेली जबाबदारी दिल्याप्रमाणे कामगिरी केली. दहा मतदारांच्या गटाची जबाबदारी एकेका कार्यकर्त्याला इतके सूक्ष्म नियोजन केले होते, त्याचा परिणाम विजयात झाला. पंढरपूरच्या विजयाने बरेच काही शिकायला मिळाले.
भाजप विरुद्ध इतर सर्व एकत्र येतात ; या निवडणुकीत पुन्हा स्पष्ट
पाँडेचरी मध्ये भाजपा आघाडी सत्तेवर येत आहे. आसाममध्ये भाजपाने सत्ता राखली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपाला गेल्या वेळच्या तीन जागांच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात जागा मिळत आहेत. देशामध्ये भारतीय जनता पार्टी हाच अत्यंत प्रबळ पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्याच्या विरोधात इतर सर्वांना एकत्र यावे लागते. हेच या निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस व डाव्यांनी निवडणुकीतून जवळजवळ माघार घेतली. भाजपाच्या विरोधात काही जण उघडपणे एकत्र लढतात. पाठीमागून बाकीचे एकत्र लढतात. पश्चिम बंगालमध्ये दुसरा प्रकार दिसला. तेथे भाजपाविरोधात छुपेपणाने सगळे एकत्र आले व धृविकरण झाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.