दुसरी लाट, लॉकडाउन आणि तारतम्य!

CoronaVirus
CoronaVirus

राज्यासह पुणे शहरात दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी चर्चा आहे. ही लाट रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. पुन्हा लॉकडाउनचा पर्याय कोणालाच परवडणारा नाही, त्याऐवजी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री पाळत कोरोनाचा तारतम्याने सामना करणेच सर्वांच्या हिताचे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात दररोज कोरोनाचे आठशेपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. दिवाळीनंतर रुग्णसंख्येत वाढ होणे स्वाभाविक होते. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये पुन्हा काळजीचे वातावरण निर्माण झाले. याच काळात राज्यातील जबाबदार मंत्र्यांनी राज्यात पुन्हा लॉकडाउनचे सुतोवाच केल्याने अनेकांच्या काळजात धस्स झाले. जिल्ह्यातील बांधकाम, उद्योगविश्व लॉकडाउनच्या नुसत्या कल्पनेनेच हादरून गेले आहे. खरे पाहता लॉकडाउन हा कोरोना रोखण्याचा पर्यायच असू शकत नाही. त्यामुळे लॉकडाउन न करता कोरोनाला कसा अटकाव घालता येईल याच दिशेने आता प्रशासनाने विचार केला पाहिजे. 

जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ९० लाख ते एक कोटीच्या आसपास आहे. सध्या जिल्ह्यात गरजेप्रमाणे चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे रोज आठशेच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. गणेशोत्सवानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती, मात्र नंतर ती कमी झाली. आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासन व आरोग्य यंत्रणेला दक्ष राहावे लागणार आहे. त्यातच युरोपात कोरोनाची दुसरी लाट आल्याने वेळेआधी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जिल्ह्यात पुणे व पिंपरी-चिंचवड अशा दोन महापालिका, १४ नगरपालिका, तीन कॅटोन्मेंट, चौदा नगरपालिका आणि १४०८ ग्रामपंचायती आहेत. प्रशासनाने या सर्व यंत्रणेला सजग करून त्या व्यवस्थेच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली पाहिजे. 

पुन्हा लॉकडाउन नकोच 
सुरुवातीच्या काळात लॉकडाउन झाल्यावर कोरोनाचा मुकाबला कसा करायचा याबाबत प्रशासन व आरोग्य यंत्रणेला अनुभव नव्हता. आरोग्ययंत्रणा, सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी लॉकडाउन आवश्‍यक असल्याचा प्रतिवाद तेव्हा करण्यात आला. समाजातील सर्व घटकांनी त्याला प्रतिसाद दिला. मात्र, लॉकडाउन म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ हे अर्थव्यवस्थेवर झालेल्या विपरीत परिणामांतून आता सिद्ध झाले आहे. लॉकडाउनमुळे हजारो जणांचे रोजगार गेले, अनेकांना वेतनकपातीला सामोरे जावे लागले. हातावरचे पोट असणाऱ्यांचे जिणे हराम झाले. हा झाला सर्वसामान्यांवरील परिणाम. उद्योगधंद्याची अवस्था याहून बिकट झाली. अनेक छोटे उद्योग, व्यवसाय बंद पडले, तोट्यात गेले. त्यामुळे संपूर्ण अर्थचक्राला पुरती खीळ बसली. 

लॉकडाउनमुळे कोरोनाला किती अटकाव झाला याबाबत निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नाही, मात्र अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे थेट पडसाद पहिल्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) उमटले. या काळात जीडीपीत ऐतिहासिक घसरण झाली. पहिल्या तिमाहीत ‘जीडीपी’ उणे २३.९ टक्के इतका राहिला. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर हळूहळू सर्व क्षेत्रे ‘अनलॉक’ झाली. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. शिथिल झालेल्या लॉकडाउनमुळे दुसऱ्या तिमाहीत ‘जीडीपी’ उणे ७.५ टक्के नोंदविला गेला. याचाच अर्थ आता कुठे अर्थव्यवस्था रुळावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनचा विचार करणे म्हणजे अर्थचक्र उलट्या दिशेला नेण्यासारखेच आहे. पुण्याच्या उद्योगविश्‍वाचा विचार केल्यास आजच्या घडीला जिल्ह्यात उत्पादन व सेवा क्षेत्रात तब्बल दोन लाख ३४ हजार छोटे-मोठे उद्योग आहेत. त्यातून सोळा लाख लोकांना थेट रोजगार मिळतो. याच्या जोडीला बांधकाम व कृषी क्षेत्रही आहे. या सर्वांच्या भरवशावरच जिल्ह्याचे अर्थचक्र अवलंबून आहे. पहिल्या लॉकडाउनमधून अजून कोणतेही उद्योगक्षेत्र पुरते सावरलेले नाही. अशा स्थितीत पुन्हा लॉकडाउन करणे कोणालाही परवडणारे नाही. 

अनुभवाचा उपयोग व्हावा!
आरोग्याच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचा अनुभव आता वैद्यकीय यंत्रणांना आला आहे. शहर व जिल्ह्यातही पुरेसे बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सि‍जनची व्यवस्था आहे. सहाशे बेडचे कोविड सेंटर उभारलेले आहे, तसेच सरकारी व खासगी डॉक्‍टरांनाही कोणत्या रुग्णांवर कशाप्रकारे उपचार करायचे हे लक्षात आले आहे. एकुणात कोरोनाची परिस्थिती हातळण्याचा अनुभव संबंधित सर्व यंत्रणांना आला आहे. त्या अनुभवाच्या जोरावर आता कोरोनाची संभाव्य लाट रोखावी लागणार आहे. आता तातडीने रुग्ण वाढणार नाहीत, या दिशेने पावले टाकली पाहिजेत. त्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करावी लागेल. त्यासाठी कडक उपाययोजना केल्यास त्याला कोणाचीच हरकत नाही. वेळप्रसंगी मास्क न वापरणाऱ्यांकडून जादा दंडवसुली करावी.

सार्वजनिक ठिकाणी लहान मुले व वृद्धांना फिरण्यास मनाई करणे व पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रात काही कडक नियमावली केली, तरी त्याचा मोठा उपयोग होईल. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांच्या चाचण्या करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कंपन्या, हॉटेल्समध्येदेखील दोन व्यक्तींमध्ये ठरावीक अंतर राहील याची दक्षता घ्यावी लागणार आहे. या साऱ्या गोष्टी सर्वसामान्यांनाही गांभीर्याने घेतल्या व त्यांची कसोशीने अंमलबजावणी केल्यास दुसरी लाट थोपविणे कठीण जाणार नाही. पण कोरोनाला रोखायचे म्हणजे थेट लॉकडाउन हा पर्याय नाही, याचे भान ठेवले पाहिजे. तारतम्याने वागत निर्णय घेणे सर्वांच्या हिताचे राहणार आहे.

हे नक्की करा

  • व्यक्तिगत पातळीवर मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा वापर करा.
  • लहान मुले व वृद्धांना फिरण्यास प्रतिबंध करा. 
  • कंपन्या, हॉटेल्स व इतर सार्वजनिक ठिकाणी वरील त्रिसूत्री कटाक्षाने पाळा. 
  • या सर्व गोष्टी पुरेशा गांभीर्याने करत प्रशासनाला सहकार्य करा. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com