पुणे : पर्यावरणास घातक असलेल्या कॅरीबॅगवर केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे. नागरिकांनी कापडी पिशव्या वापरून प्रदूषण टाळावे असे वारंवार आवाहन केले जाते. पण महापालिकेच्या या आवाहनाला व्यावसायिकांनी ठेंगा दाखवला आहे. गेल्या साडे तीन महिन्यात केवळ २५७ जणांवर कारवाई करून १२ लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. पण महापालिकेकडून केवळ दिखाऊ कारवाई केली जात असल्याने व्यावसायिक व ग्राहकांवर जबर नसल्याने कॅरिबॅग वापराचे प्रमाण वाढत आहे.
केंद्र सरकारने २०१६ मध्ये कॅरिबॅगच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. २०१८ पासून ७५ मायक्रॉनपेक्षा कमी वजनाच्या प्लास्टिकवर कारवाई केली जात होती. केंद्राने हा कायदा आणखी कडक करत ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगच्या वापरावर बंदी घातलेली आहे. प्लॅस्टिकचे झेंडे, प्लास्टिकच्या प्लेट्स, चहाचे कप, पाण्याचे पाऊच, स्ट्रॉ, नॉन बॅग्ज स्टायरोफोम, थर्माकोल, प्लास्टिक पत्रके, प्लास्टिक पत्रकांचे आवरणे, प्लॅस्टिक सहित बहुस्तरीय आवरण, वेष्टण असलेल्या वस्तू व एकदाच वापर होऊ शकले अशा कोणत्याही प्लास्टिकच्या वस्तू, पीव्हीसी बॅनर, स्टिकरचा वापर, साठवण, विक्री, वितरण यावर बंदी घालण्यात आली आहे.
याचे उल्लंघन केल्यास पहिल्या वेळेस ५ हजार रुपये दंड, दुसऱ्या वेळेस १० हजार तर तिसऱ्या वेळेस उल्लंघन केल्यास २५ हजाराचा दंड आणि तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते,असे कायद्यात नमूद केलेले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी या कायद्याची अंमलबजावणी करून कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. पण शहरात होलसेल बाजारपेठेसह किराणा दुकानदार, बेकरी, भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांच्यासह इतर व्यावसायिकांकडून वापर सुरु आहे.
शहरात रोज २१०० ते २२०० टन कचरा निर्माण होत असताना त्यामध्ये सुमारे प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण मोठे आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचे विघटन होत नसल्याने पर्यावरणास धोका निर्माण होत आहे. त्यांची विल्हेवाट लावताना महापालिकेच्या नाकी नऊ येत आहे.
प्लास्टिकच्या वापराच्या परिणाम
- उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यात कॅरिबॅगचे प्रमाण जास्त
- सार्वजनिक ठिकाणे, नाले, नदी, मोकळ्या जागांमध्ये कॅरिबॅग विखरून प्रदूषण वाढत आहे
- पावसाळी गटाराच्या चेंबरमध्ये प्लास्टिक अडकल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळे
- कॅरिबॅगमधील शिळे अन्न, इतर खाद्यपदार्थ मोकाट जनावरे खाताना थेट पोटामध्ये कॅरिबॅग जात आहेत
अशी आहे स्थिती
- १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कारवाईसाठी पथक आहे
- पण दिवसातून सरासरी दोन ते तीनच कारवाई केली जाते
- होलसेल मार्केटमध्ये कॅरिबॅग सर्रास विक्री होत आहे
- दुकानांमध्ये ग्राहकांना कॅरिबॅग दिली जात असता त्यावर कारवाईकडे दुर्लक्ष
- निवडणुकीच्या कामामुळे मनुष्यबळ कमी झाल्याने कारवाई थंडावल्याचा प्रशासनाचा दावा
‘‘विघटन न होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्यांच्या विक्री, वापरावर पूर्णपणे बंदी आहे. यावर कारवाई केली जाते. पण सध्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने कारवाईचे प्रमाण कमी झाले आहे. पण उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाकडून कारवाई वाढविण्याचे आदेश दिले जातील.’’
- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग
प्लास्टिक वापरावरील कारवाई
जानेवारी : केसेस - ४२
दंड - २.१० लाख
फेब्रुवारी : केसेस - ९९
दंड - ५ लाख
मार्च : केसेस ९३
दंड - ४.७० लाख
एप्रिल : केसेस - १८
दंड १.१५ लाख
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.