औदयोगिक क्षेत्राला लॉकडाउनमधून वगळा; अजित पवारांकडे मागणी

औदयोगिक क्षेत्राला लॉकडाउनमधून वगळा; अजित पवारांकडे मागणी

बारामती : गेल्या लॉकडाऊनच्या काळातच उद्योजकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. अशा स्थितीत आता पुन्हा दोन आठवड्यांचे लॉकडाऊन उद्योग क्षेत्रास परवडणारे नाही. आगामी लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास त्यातून औद्योगिक क्षेत्राला वगळावे अशी विनंती बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहीलेल्या पत्रात असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी लॉकडाऊनमधून औद्योगिक क्षेत्राला वगळावे अशी आग्रही मागणी केली आहे. केंद्राच्या लॉकडाऊनच्या काळात सर्व उद्योग उद्योजकांनी बंद ठेवून सहकार्य केलेले होते. राज्यातील औद्योगिक क्षेत्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करते आहे. अशा स्थितीत आता पुन्हा जर उद्योग बंद ठेवण्याची पाळी आली तर उद्योजकांचे आर्थिक कंबरडे मोडेल, अशी भीती या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. 

गेल्या लॉकडाऊनच्या काळात परप्रांतिय कामगार परतल्याने व आताही लॉकडाऊनच्या भीतीने कामगार गावी जाऊ लागल्याने उद्योजकांचे कमालीचे नुकसान होते आहे. अनेकांनी मोठी कर्जे काढून उद्योग उभारणीचे प्रयत्न केले आहेत, अशा उद्योजकांना कर्जाचे हप्तेही भरता येणे अवघड होणार आहे. मागील लॉकडाऊनमधूनच अजून उद्योग क्षेत्र पुरेसे सावरलेले नसताना आता पुन्हा एकदा लॉकडाऊनचा निर्णय झाला तर अनेक कंपन्यांना कुलूपे लावावी लागतील, अशी भीती जामदार यांनी व्यक्त केली आहे. 

उद्योजकांवर अनेक कामगारही अवलंबून असून कामगारांवरही बेकारीची पाळी येईल, सर्वांनाच याचा मोठा फटका सहन करावा लागेल, याचा विचार करुन राज्य सरकारने औद्योगिक क्षेत्राला लॉकडाऊनमधून वगळावे, अशी विनंती उपमुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com