अजित पवारांच्या हस्ते होणारी महापूजा योग्यच : अॅंड. शंकर महाराज शेवाळे 

अजित पवारांच्या हस्ते होणारी महापूजा योग्यच : अॅंड. शंकर महाराज शेवाळे 

मंचर : ''राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीनिमित्त होणारी श्री क्षेत्र पंढरपूर येथील महापूजा योग्यच आहे. राज्याचा राजा म्हणजेच राज्यातील जनता असते. राजाने पूजा करणे म्हणजेच प्रतिनिधिक स्वरुपात समग्र तळागाळातील वारकरी व समाज बांधवांनी पूजा करण्यासारखे आहे. कार्तिकी वारी संदर्भात वारकरी नेत्यांनी कोणत्याही एका पक्षाचे स्तुती पाठक न होता दिशाभूल करण्याचे प्रकार थांबविले पाहिजेत. हा विषय वारकऱ्यांचा आहे. मात्र भलत्यांचीच चमकोगिरी खपवून घेतली तर वारकरी संप्रदाय एका वेगळ्या दिशेने वाटचाल करेल.'' असे मत अखिल भारतीय वारकरी मंडळ केंद्रीय समिती सदस्य व कीर्तनकार अॅड. शंकर महाराज शेवाळे यांनी व्यक्त केले.

श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेच्या तोंडावर प्रशासनाने संचारबंदीसह इतर काही निर्बंध घातले आहेत. त्यानिमित्ताने पवार यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला वारकरी पायीक संघाचा विरोध राहील. अशी ठाम भूमिका वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी मांडली आहे. यासंदर्भात  पुणे जिल्ह्यात वारकरी क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले आहेत.

महावीर महाराज सूर्यवंशी ,विनोद महाराज  महाळूंगकर,दीपक महाराज खांदवे, राजू महाराज भाडळे, विजय महाराज पवार, ज्ञानेश्वर महाराज दौंडकर, सुखदेव महाराज ठाकूर, संगीता महाराज चोपडे, संतदास महाराज मनसुख, बाळासाहेब महाराज विनोदे आदींनी राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले असून, शासकीय पूजेला विरोध करणाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त केली.

शेवाळे महाराज म्हणाले, ''श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र देहू मंदिर व वारकरी परंपरा यांच्याशी काडीमात्र संबंध नसणारे आपले मत व्यक्त करून भोळ्याभाबड्या वारकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. कोरोना सारख्या महाभयंकर महामारीमुळे सगळं जग चिंतेत आहे. अनेकांना जीव गमवावा लागला. अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातून सावरत असताना दुसऱ्या लाटेची सुरवात झाली आहे. गुजरात राज्यात संचारबंदी सुरु झाली आहे. या पार्शवभूमीवर राज्य सरकारने वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हितासाठी घेतलेला निर्णय योग्य आहे. या निर्णयाच्या विरोधात  सुरु असलेले राजकारण दुर्दैवी आहे. अशा राजकारणाचा खेळ सुरु ठेवणे म्हणजे वारकऱ्यांना  मृत्यूच्या दाढेत लोटण्यासारखा आहे. श्री संत तुकाराम महाराज असे म्हणतात की ''जया  शिरी कारभार ! बुद्धी सार तयाची'' !! नेता हा राजकारणातील असो  किंवा वारकरी संप्रदयातील, स्वयंम घोषित नेते असो यांनी आपली बुद्धी सार ठेवावी. हा राजकाणातील खेळ थांबवा, अन्यथा येणारा काळ व महाराष्ट्रातील वारकरी त्यांना कधीही माफ करणार नाहीत. याची संबंधितानी नोंद घ्यावी.''

यांनी भारतीय जनता पक्ष संलग्न असलेल्या वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज वासकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी कार्तिकी वारीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रोखण्याचे धाडस करू नये. अन्यथा वारकऱ्यांचा रोष ओढवून घ्याल, असा इशारा वारकरी प्रबोधन समितीचे जुन्नरचे अध्यक्ष संतदास महाराज मनसुख यांनी दिला आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com