डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष

डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष

भोसरी - पुण्यात भाड्याच्या खोलीत हालाकीच्या परिस्थितीत कसाबसा थाटलेला संसार...तळेगावात भारतरत्न डॅा. बाबासाहेबांच्या सभेचा कार्यक्रम... डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्याची लागलेली ओढ...मात्र प्रवासासाठी एक पैही जवळ नाही...अशा परिस्थितीत घरातील एकमेव तांब्याचा हंडा विकून डॅा. बाबासाहेबांच्या सभेला हजर राहून त्या महासूर्याला पाहून कृतकृत झालेल्या  सध्या भोसरीत राहणाऱ्या ८४ वर्षांच्या शांताई राजानंद गडपायले आजही तो अनुभव सांगताना गदगदीत होतात.

शांताई गडपायले यांचे पती कालकथीत राजानंद गडपायले यांनी हजारो भीमगीते लिहीली. त्याचप्रमाणे त्यांनी लिहीलेली भीमगीते त्यांना डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोरच गाण्याचे भाग्य लाभले. तळेगावमध्ये डॅा. बाबासाहेब आंबेडकरांची सभा १५ जून १९५० साली घेण्यात आली. या सभेच्या अगोदर जनजागृती करणारे कवी व गायक यांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कालकथीत कवी राजानंद गडपायले यांनाही त्या ठिकाणी गाण्याची संधी मिळाली. त्यामुळे गडपायले हे पुण्याहून तळेगावला कार्यक्रमासाठी गेले. मात्र त्यांच्या पत्नी शांताई गडपायले यांनीही  भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्यासाठी कार्यक्रमाला जाण्याचा निश्चय घेतला. मात्र गाडीखर्चासाठी एक पैही जवळ नव्हती. शांताई यांनी घरातील एकमेव असेलला तांब्याचा दोन रुपयाला विकला. त्यानंतर काही अंतर टांग्याने तर काही अंतर पायी कापून त्या सभेला पोचल्या आणि महासूर्याला प्रत्यक्ष पाहून हरकून गेल्या. हंडा विकलेला असल्याने कार्यक्रम संपल्यानंतर त्या कवी राजानंद गडपायले यांना न भेटताच पुण्याला आल्या. मात्र पुण्यात आल्यानंतर त्यांनी पिण्याचे पाणी धान्य साठविण्यासाठी असलेल्या पत्र्याच्या डब्यात भरून ठेवले. हे पाहून रात्री घरी आलेल्या कवी राजानंद यांनी तांब्याच्या हंड्याबद्दल विचारणा केली. मात्र शांताई यांनी घाबरून सागण्याचे टाळले. बराच वेळ होऊनही उत्तर मिळत नसल्याचे पाहून राजानंद यांच्याकडून शांताई यांना मारही खावा लागला. शेवटी हंडा विकून डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यक्रमाला आलेले कळताच राजानंद यांना पश्चाताप झाला. त्यांनी शांताई यांची माफी मागितली आणि म्हणाले, "तुझी डॅा. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची श्रद्धा माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे."

या विषयी शांताई गडपायले म्हणाल्या, "डॅा. बाबासाहेब आंबेडकर सूटाबूटात रुबाबदार दिसत होते. समाजासाठी जीवाचे रान करत कुठल्याही संकटाने न डगमगता शेवटपर्यंत अन्यायाचा प्रतिकार करणारे डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन झाल्यावर जीवनाचे सार्थक झाले. "

कवी व गायक राजानंद गडपायले यांनी हजारो भीमगीते लिहीली आणि गायली. तळेगाव येथील कार्यक्रमात त्यांची गीते ऐकल्यानंतर भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्ष त्यांचे कौतुक करून त्यांना गौरवपत्रपत्र दिले. ते गौरवपत्र आजही शांताई गडपायले यांनी जपून ठेवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com