नाटक ही सामूहिक कलाकृती - वजाहत

Asgar-Vajahat
Asgar-Vajahat

पुणे - नाटक ही सामूहिक कलाकृती असून, लेखकाने आपल्यामुळेच सारे चांगले झाले, या भ्रमात राहू नये. प्रत्येक दिग्दर्शक, प्रत्येक अभिनेता त्या कलाकृतीचा पुनर्जन्म करीत असतो, असे मत प्रसिद्ध नाटककार असगर वजाहत यांनी व्यक्त केले.

महावीर जैन वसतिगृहात झालेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांवर मनमोकळेपणे उत्तरे दिली. गझलकार प्रदीप निफाडकर, दीपक म्हस्के, अभिनेत्री धनश्री हेबळीकर आणि वसतिगृहाचे प्रमुख युवराज शहा यांनी ही मुलाखत घेतली.

वजाहत हे हिंदी साहित्यात मार्मिक टिप्पणी करण्याबाबत प्रसिद्ध आहेत. त्याचा अनुभव आज पुणेकरांनी घेतला. त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता ठाम मते मांडली. ते म्हणाले, ‘‘जिसने लाहोर नहीं देख्या, वो जम्या नहीं. हे नाटक लिहिताना मी आधी लाहोर पाहिलेही नव्हते; पण लाहोरच्या दर्यादिलीवर, तेथील माणुसकीच्या अनेक कथा मी ऐकल्या होत्या. त्यासाठी तीन वर्षे मी वाचन, संशोधन करीत होतो.’’ 

मी लखनौ किंवा लाहोर उभे केले, यापेक्षा काळाला एखाद्या पात्राच्या भूमिकेत नाटककार पाहत असतो. मी तसेच केले. त्या नाटकावर पाकिस्तानात जरी बंदी आली, तरी जगाच्या कानाकोपऱ्यात विविध भाषांमध्ये त्याचे प्रयोग झाले. हबीब तन्वीरसारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाने त्याला सोन्याचा वर्ख लावला, असे ते म्हणाले.
बेगम अख्तर, शहरयार आणि शैलेंद्र यांच्यासारख्या प्रतिभावंतांचा सहवास लाभूनही आपण गझला का लिहिल्या नाहीत, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ‘‘कवी होणे हे कदाचित पुण्याचे फळ असते. कविता लिहिणे फार मोठ्या प्रतिभावंताचे काम असते. मला कविता जमल्या नाही म्हणण्यापेक्षा मी हा विचार केला, की साधारण कविता लिहिण्यापेक्षा कविता न लिहिणेच चांगले. 

म्हणून मी लिहिल्या नाहीत.’’ धर्मवीर भारती यांनी नाकारलेली पहिली कथा, आपले मूळ शोधताना इराणमध्ये झालेली अटक, नाटकासाठी घेतलेली मेहनत, या साऱ्यावर त्यांनी प्रकाश टाकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com