आपटाळे : महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा बळी गेल्याची संतप्त भावना व्यक्त करत काले, दातखिळेवाडी येथील ग्रामस्थांनी अधिकारी व कर्मचारी यांना घेराव घालून धारेवर धरले. महावितरणने तातडीने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी विशाल पानसरे, सचिन दातखिळे यांनी यावेळी केली.
अधिक माहिती अशी, काले (ता. जुन्नर) येथे गुरुवारी (ता. ९) आदिनाथ सबाजी दातखिळे हे शेतकरी जनावरांना चारण्यासाठी घेऊन गेले होते. सांयकाळी सहाच्या सुमारास वादळाने मारुती नायकोडी यांच्या टोमॅटोच्या बागेजवळ असणाऱ्या विजेच्या खांबावरील तार तुटून टोमॅटोच्या बागेत पडल्याने तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू झाला. यावेळी शेतकरी आदिनाथ दातखिळे (वय ५५) यांचा स्पर्श टोमॅटोच्या बागेच्या तारेला झाल्याने त्यांचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर महावितरणचे कर्मचारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी येण्यास उशीर झाल्याने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत फैलावर घेतले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे ही दुर्दैवी घटना घडली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. जीर्ण झालेल्या विद्युत वाहक तारा बदलल्या असत्या अथवा दोन खांबामधील तारांमध्ये ठिकठिकाणी ब्रॅकेट्स बसवले असते तर ही घटना टळली असती, असे शशिकांत पानसरे यांनी सांगितले. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी महावितरण ने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी कुलदीप नायकोडी यांनी केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.