माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी साधला राष्ट्रवादीवर निशाणा

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी साधला राष्ट्रवादीवर निशाणा

नारायणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेना कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. शिवसेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणूका सर्व शक्तीनिशी स्वबळावर लढवाव्यात. असा आदेश शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथील मेळाव्यात दिला.

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आज सायंकाळी येथील जयहिंद मंगल कार्यालयात जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या वेळी माजी खासदार आढळराव पाटील यांनी निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले.

या वेळी माजी आमदार शरद सोनवणे, तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे, सरपंच योगेश पाटे, माजी उपजिल्हा प्रमुख संभाजी तांबे, नगराध्यक्ष शाम पांडे, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, मंगेश काकडे, शरद चौधरी आदी मान्यवर विविध गावचे माजी सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

आढळराव पाटील म्हणाले, ''राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जरी असले तरी स्थानिक ग्रामपंचायत निवडणूका एकत्र लढवण्याचे स्पष्ट आदेश नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आघाडीच्या आचारसंहितेचे पालन केले जात नाही. अमिष दाखवून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्याचे काम सुरू आहे. समाजकारण व राजकारणाचा मूळ पाया ग्रामपंचायत निवडणूका हाच आहे. ग्रामपंचायतीत अस्तित्व नसेल तर अन्य निवडणुका लढवण्यात अर्थ नाही. सहकार व ग्रामपंचायत ताब्यात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात बळकट झाला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील २९४ ग्रामपंचायतिच्या निवडणूका होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची व स्थानिक कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची लढाई असते. ग्रामपंचायत निवडणूका स्वबळावर सर्व शक्तीनिशी लढवा. मोठ्या ग्रामपंचायत ताब्यात घ्या. पक्षाची सर्व ताकद तुमच्या मागे उभी केली जाईल.'' 

माजी आमदार सोनवणे म्हणाले, ''शिवसेनेचा आमदार
खासदार नाही म्हणून निष्ठा बदलू नका. महाआघाडीचे सरकार वर आहे. स्थानिक पातळीवर स्वबळावर निवडणूक लढवून पुढील निवडणुकीची पायाभरणी करा. निवडणुकीसाठी पॅनेल तयार करा. आवश्यक ती मदत केली जाईल.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या वेळी खंडागळे, पाटे, पांडे यांनी लढण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. सूत्रसंचालन अभय वाव्हळ यांनी केले तर आभार महेश शेळके यांनी मानले.

(संपादन : सागर डी. शेलार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com