पुणे : राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे चालू खरिपात झालेल्या पीक नुकसानीनंतर शेतकऱ्यांच्या साडेपाच लाखांहून अधिक पूर्वसूचना दाखल झाल्या आहेत. यातील चार लाख शेतस्थळांची पाहणी पूर्ण झाली.
अतिवृष्टीमुळे राज्यातील खरीप पिकांची काही तालुक्यांमध्ये दाणादाण झाली आहे. लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून पंचनाम्याची कामे अद्याप सुरू आहेत. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाच्या सरासरी उत्पादनात जास्त घट अपेक्षित असल्यास भरपाईच्या प्रमाणातील २५ टक्कांपर्यंत रक्कम आगाऊ स्वरूपात विमाधारक शेतकऱ्यांना दिली जाते. विमा कंपन्या व कृषी विभागाकडून या मुद्द्यांवर कामे सुरू आहेत.
पिकाचे नुकसान झाल्याची माहिती अर्थात ‘पूर्वसूचना’ किंवा ‘इंटिमेशन’ शेतकऱ्याकडून ७२ तासांत आली पाहिजे. त्यानंतर मात्र विमा कंपन्यांना अशा शेतांची पाहणी करावीच लागते. कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘राज्यात पीक नुकसानीबाबत एक ऑगस्टपर्यंत २ लाख ५६ हजार ९८५ पूर्वसूचना आल्या. त्यानंतर एक सप्टेंबरपर्यंत त्यांची संख्या ४ लाख १५ हजार ७४७ झाली आणि आता ९ सप्टेंबरपर्यंत ही संख्या ५ लाख ५३ हजार ४९१ पर्यंत गेली आहे.’’
शेतकऱ्यांनी दिलेल्या पूर्वसूचनांकडे विमा कंपन्यांना दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळेच गेल्या वर्षी खरिपात शेतकऱ्यांनी दिलेल्या ५ लाख २० हजार ४४६ पूर्वसूचनांची दखल घेत शेतकऱ्यांना ३९२ कोटी १२ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. ‘‘राज्याच्या काही भागात सध्यादेखील मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे खरीप पिकांचे होणारे नुकसान बघता शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक पूर्वसूचना दाखल कराव्यात’’, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
‘‘पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पुराचे पाणी शेतात शिरून, शेत दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी वेळ दवडू नये. पर्यायांचा वापर करून ७२ तासांच्या आत पूर्वसूचना द्यावी,’’ असेही आवाहन कृषी विभागाने केले आहे.
बँक शाखेतही देता येणार पूर्वसूचना
विमा कंपनीचे तालुका कार्यालय तसेच विमाहप्ता जमा केलेली बँक शाखा अशा सहा पर्यायांपैकी कोणत्याही एका पर्यायाचा वापर करता येईल. शेतकऱ्यांनी या पर्यायांचा वापर करून ऑगस्ट महिन्यात १ लाख ५८ हजार ७६२ तर सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांत १ लाख ३७ हजार ७४४ पूर्वसूचना दिल्या आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.