इंदापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे यांच्या इंदापूर येथील ऐतिहासिक गढीचा बुरुज रविवार (ता.01) रोजी रात्री झालेल्या पावसाने ढासळला.यामुळे गढीच्या संवर्धनचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या ऐतिहासिक गढी संवर्धन व स्मारक उभारणेसाठीच्या कामाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी तमाम शिवभक्तांमधून करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे यांचे वास्तव्य असलेली इंदापूर येथील ऐतिहासिक गढी आहे.यामध्ये निजामशाहीच्या काळात अनेक गावे वतन दिलेली होती, या वतन गावांमध्ये इंदापूर हे गाव मालोजीराजे यांना वतन दिलेले होते.
इंदापूर येथे सन 1606 मध्ये झालेल्या युद्धात मालोजीराजे यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांची समाधी त्यांचे वास्तव्य असलेल्या पुरातन गढी समोरील जागेत होती, याची नोंद शिवभारत ग्रंथात आढळून येत असल्याची माहिती उपलब्ध असल्याचे बोलले जाते.
त्यामुळे या ऐतिहासिक मालोजीराजांच्या गढीच्या संवर्धना संदर्भात शासकीय कागदपत्रानुसार हस्तांतरण करून, गढीला पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन, सदर ठिकाणी वीरश्री मालोजीराजेंचे भव्य स्मारक उभारणेच्या कामाचा बृहत आराखडा तयार करून, निधी उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे यापूर्वी अनेक वेळा इंदापूर येथील आजी माजी आमदार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले आहे.
मात्र प्रत्यक्ष कामास कधी मुहूर्त लागेल याबाबत कोणही स्पष्ट बोलत नाहीत.अशातच रविवार (ता.01) रोजी दुपारी व संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री या गढीचा प्रवेश द्वारावरील डाव्या बाजूचा बुरुज ढासळला आहे.यामुळे आगामी काळात अजून पडझड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
किमान आता तरी या गढीच्या संवर्धनाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, नागरी संघर्ष समितीचे प्रमुख व माजी उपनगराध्यक्ष प्रा.कृष्णा ताटे, गटनेते कैलास कदम, महादेव सोमवंशी, हमीद आतार, महादेव चव्हाण, प्रदीप पवार, अशोक ननवरे यांचेसह अन्य शिवभक्तांनी केली आहे. गढी भोवतीच्या अतिक्रमणाचा प्रश्न ही गंभीर. दरम्यान मालोजीराजे यांच्या गढीच्या सर्वच बाजूंनी अतिक्रमणाचा विळखा घातला जात आहे. त्यासाठी गढी पोखरण्याचे काम केले जात आहे.यामुळे सुद्धा गढीचे अस्तिस्त धोक्यात येत असून यावरही कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींन मधून होत आहे.
प्रत्येक कामाला मुहूर्त केव्हा ?
या गढीच्या संवर्धनासाठी शासन स्तरावर विकास कृती आराखडा तयार करून लवकरच या गढीच्या पुनर्वसन आणि पुनर्जीवीकरणासाठी शासनाकडे पाठपुरावा झालेला आहे. माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी अधिवेशनात लक्षवेधी मध्ये हा प्रश्न तारांकित करत सभागृहाचे लक्ष वेधले होते.
यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेत निधीबाबत आश्वासित केले होते.तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक पर्यटन विकास मंत्री यांना भेटून याबाबत पाठपुरावा केला. असे सर्व असताना या गढीच्या कामाला प्रत्यक्ष केव्हा मुहूर्त लागणार असा प्रश्न शिवप्रेमी मधून उपस्थित केला जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.