Sharad Pawar : पंतप्रधानांवर टीका करणाऱ्यांना तुरुंगात टाकतात

ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. जे पंतप्रधानांवर टीका करतील, त्यांना तुरुंगात टाकले जात आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal

इंदापूर - ‘भारतीय जनता पक्षाच्या हातात देशाची सत्ता आहे. लोकशाहीत सत्ता मिळवणे आणि ती जनतेच्या हितासाठी वापरणे गैर नाही, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर सत्तेचा वापर करून जर हल्ला होण्याची वेळ आली तर जनतेने जागरूक राहणे आवश्यक आहे.

ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. जे पंतप्रधानांवर टीका करतील, त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. हा संकटाचा प्रसंग असून, तो परतावायचा असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे सर्वांनी उभे राहिले पाहिजे,’ असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

इंदापूर येथे बाजार समितीच्या प्रांगणामध्ये आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी शरद पवार बोलत होते. यावेळी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, आमदार रोहित पवार, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

संजय राऊत म्हणाले, ‘बारामती लोकसभा मतदारसंघाची लढाई ही फक्त बारामतीची नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेची व स्वाभिमानाची लढाई आहे. दादागिरी, दहशतवाद, धमक्या देऊन बारामतीचा जर कोण गुजरात करू पाहत असेल तर शिवसेना गप्प बसणार नाही.

राज्यात व देशात कांद्याला दुधाला भाव नाही तर गद्दारांना भाव आहे. मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करू असे सांगितले, मात्र काय अवस्था आहे? नको असले आम्हाला अच्छे दिन, २०१४ च्या आधीचे अच्छे दिन परत द्या.’

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘जो विरोधात बोलतो त्यांना आतमध्ये घाला, ही भाजपची निवडणूक पद्धत वेगळी आहे. तुम्ही नेत्यांना आतमध्ये घालू शकता, पण जनतेला मतदारांना दाबू शकत नाही.’

सभेला येऊ नये म्हणून धमक्या देण्यात आल्या, पण इंदापूरकर घाबरणार नाहीत, हे दिसून येते. यापूर्वीच्या कोणत्याही निवडणुकीत नाती वैयक्तिक कटुता आणली नाही, पण यंदा निवडणूक वेगळीच वाटत आहे. रडत बसायचं नाही, लढत बसायचं.

- सुप्रिया सुळे, खासदार

भाषणातील मुद्दे

  • पंतप्रधानांनी सांगितले इथेनॉल निर्मिती करा. यासाठी कारखान्यांनी अनेक संकटांवर मात करत यंत्रणा उभी केली. नंतर मात्र इथेनॉलवरच बंदी घालण्यात आली. त्यामुळे कारखान्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला. सहकारी साखर कारखाने अडचणीत आले.

  • ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नांची जाण नाही.

  • दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करतात मात्र केंद्र याकडे ढुंकूनही बघत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com