अतिवृष्टीने पुरंदरमध्ये भातपिकाचे मोठे नुकसान

अतिवृष्टीने पुरंदरमध्ये भातपिकाचे मोठे नुकसान

सासवड : येथे पुरंदर तालुक्यातील 1,100 हेक्टरपैकी सुमारे 500 हेक्टरवरील भात पिकास नुकत्याच झालेल्या पावसाचा थेट फटका बसला आहे. तर बाकी 400 हेक्टरवरील भात उत्पादन 50 टक्के नुकसानीत जाईल., अशी स्थिती आहे. 200 हेक्टरमधील भातपिकास मात्र कमी नुकसान होण्याची शक्यता आहे. एकुणच गेल्या अनेक वर्षानंतर भात उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. त्यामुळे भातपिकाचे त्वरीत पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

सासवड बाजूला चोवीस तासात 81 मि.मी. पाऊस झाला. त्या काळात डोंगरी भागात तर याच्या दिडपट पाऊस झाला. शिवाय तीन दिवस पाऊस पडतच राहीला. त्यातून पिक नुकसान मोठे आहे. असे सासवडच्या आचार्य अत्रे वेधशाळेचे नितीन यादव म्हणाले. पानवडी खोऱयात तर सततच्या पावसाने 50 टक्के भात पिक पडले. 25 टक्के पिक अजूनही पाण्यात झोपले आहे. त्यामुळे नुकसान आताच 50 टक्के आहे.

पुढील परिस्थितीनुसार ते 75 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता गृहीत धरुन महसूल विभागाने त्वरीत पंचनामे करावेत., अशी मागणी पानवडीचे उपसरपंच संदीपतात्या भिसे यांनी केली. तर काळदरीचे उपसरपंच अंकुश परखंडे म्हणाले., काळदरी खोऱयात इंडम, कर्जत वाणाच्या भाताचे मोठे नुकसान झाले. या वाणाचे 50 ते 60 टक्के नुकसान झाल्यात जमा आहे. इंद्रायणी वाणाचे 40 टक्के नुकसान आहे. इंद्रायणी वाणात विलंबाच्या लागणीचा फुलोरा पावसाने झडून वाहून गेला. तर अोढा, नाल्यालगतचे खाचारातील निसावलेले पिक मात्र अजूनही पाण्यातच आहे.

केतकावळ्याचे माजी सरपंच बापुसाहेब भडाळे सकाळशी बोलताना म्हणाले, केतकावळे व कुंभोशी पट्ट्यात भात पिकाचे 40 ते 50 टक्के नुकसान आहे. अगोदरच तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आणि त्यात भात खाचराच्या ताली वाहून कुठे - कुठे भातपिकही वाहीले. पाऊस उघडून दोन दिवस झाले, तरी 30 ते 35 टक्के पिक अजून पाण्यात आहे. ताली पडण्याचे नुकसान मोठे आहे. काळसरेवस्तीचा पुल पूर्ण वाहून गेला, कुंभोशी पुल अर्धा वाहून गेला. यंदा हंगाम तोट्यात जाईल. अजित बाठे म्हणाले., पिक नुकसान इतके मोठे असल्याने तलाठ्याशी संपर्क करुन पंचनामे करणे व भरपाईची मदतही लवकर देण्याबाबत आपण विनंती केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

किल्ले पुरंदरच्या घेऱयातील गावांमध्येही भाताचे नुकसान 40 ते 60 टक्क्यांच्या दरम्यान आहे. शिवाय या सर्वच खोऱयात पावटा, भूईमूग, उडीद, घेवडा, ज्वारी, बाजारी, चारापिके, भाजीपाला याचेही कधी झाले नाही.. एवढे नुकसान झाले आहे., भिवडीचे शहाजीआबा गायकवाड, पानवडीचे हरीभाऊ लोळे यांनी सांगितले. 

दोन दशकात सर्वाधिक नुकसान..गतवर्षी सप्टेंबरमध्ये ढगफूटी झाली, तेंव्हा 25 ते 30 टक्केच भाताचे नुकसान झाले होते. यंदा मात्र आता प्रथमदर्शनी 50 टक्के नुकसान नजरेला दिसत आहे. पाण्यातील पिक अजून किती नुकसानीत जातेय. त्यावर नुकसानवाढ होऊ शकते. यंदाचे हे भातपिकाचे नुकसान गेल्या दोन दशकात सर्वाधिक आहे., असे अंकुश परखंडे, संदीपतात्या भिसे म्हणाले. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com