पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइकची गरज; रामदास आठवले

जम्मू काश्मीरमधील हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा कुटील डाव असून, जम्मू काश्मीरमध्ये उद्योजक आणि नागरिकांवर दहशतवाद्यांकडून हल्ले होत आहेत.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSakal

पुणे - जम्मू काश्मीरमधील हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा कुटील डाव असून, जम्मू काश्मीरमध्ये उद्योजक आणि नागरिकांवर दहशतवाद्यांकडून हल्ले होत आहेत. त्यामुळे पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करावा लागेल. पाकिस्तानने हल्ले थांबवले पाहिजेत. त्यांना विकास करायचा असेल तर दहशतवादी कारवाया थांबवून पाकव्याप्त जम्मू भारताच्या ताब्यात द्यावा. अन्यथा पाकिस्तानशी आरपारची लढाई करावी लागेल, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.

पुण्यातील व्हीआयपी विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी भारत-पाकिस्तानच्या मुद्यांसह महापालिका निवडणुकांच्या विषयांवर आपली मते मांडली.

आठवले म्हणाले, भारत- पाकिस्तान क्रिकेट मॅच होऊ नये, असे माझे आणि रिपब्लिकन पक्षाचे मत आहे. पाकिस्तानबरोबर खेळू नये, याबाबत गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आणि क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी जय शहा यांना सांगेन. खेळामध्ये राजकारण आणू नये हे खरे आहे, पण अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये.

महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न नाही -

महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याची आम्हाला गरज नाही. केंद्रीय तपास यंत्रणा देशाच्या ताब्यात असल्या तरी मोदी सरकार अशा सूचना देत नाहीत. राज्यातील सरकार अस्थिर करायचे असते तर एक वर्षांपूर्वीच केले असते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत आपल्याला कायम आदर आहे. परंतु केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याच्या पवार यांच्या आरोपाशी मी सहमत नाही.

Ramdas Athawale
टूर कंपनीला ग्राहकाकडून कपात केलेले पैसे व्याजासह परत द्यावे लागणार

महापालिका निवडणूक भाजपासोबतच लढणार :

राज्यातील महापालिका निवडणुकीत भाजपसोबत आमचा पक्ष राहणार आहे. पुण्यात महापौरपद आणि मुंबईमध्ये उपमहापौर मिळाले पाहिजे. आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यात 15 ते 20, तर मुंबईमध्ये 30 ते 35 जागा मिळाल्या पाहिजेत, असा आमचा आग्रह राहील. मात्र महापालिका निवडणूक भाजपच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार की रिपब्लिकन पक्षाच्या हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

भाजपने मनसेच्या नादाला लागू नये -

भाजप आणि मनसेच्या युतीबाबत आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्ष असताना भाजपला मनसेची गरज नाही. मनसेमुळे भाजपचे नुकसान होऊ शकते. त्याचा परप्रांतीय मुद्दा बघून भाजपने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये. आम्ही भाजपचा नाद सोडला तर ते आमचा नाद सोडणार नाही.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यात मागासवर्गीयांच्या विकासासाठी योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष संजय सोनवणे, ऍड. मंदार जोशी, हनुमंत साठे, महेंद्र कांबळे, ऍड. आयुब शेख, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, असित गांगुर्डे, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, माहिपाल वाघमारे, शैलेश चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com