पिंपरी : ‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एक तरी ओवी अनुभवावी।।...’ या संत नामदेव महाराज यांच्या विचारांना अनुसरून आज प्रत्येक भाविक पारायणाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी वाचतो आहे. त्यातील शब्द न् शब्द प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून ऐकतो आहे. पण, चिंचवड येथील भोलेश्वर प्रतिष्ठान आणि श्री ज्ञानेश्वरी सेवा समितीने लिखित स्वरूपात ज्ञानेश्वरीचा ज्ञानयज्ञ अर्थात ‘अक्षरवारी’ आरंभली आहे. गेल्या दोन वर्षात राज्याच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील ३१ हजारांपेक्षा अधिक भाविकांनी आतापर्यंत ज्ञानेश्वरी स्वहस्ते वहीत उतरवली आहे. अजूनही अनेक भाविक लिहीत आहेत, काहींनी लिहायला प्रारंभ केला आहे. सव्वालाख भाविकांनी ज्ञानेश्वरी लिहावी, असा प्रतिष्ठान व समितीचा मानस आहे.
महाभारत काळात कौरव-पांडव युद्धाप्रसंगी भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता. त्या संस्कृत भाषेतील ग्रंथाचे प्राकृत मराठी भाषेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी बाराव्या शतकात केलेले विवेचन म्हणजे भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी. त्यातील प्रत्येक ओवी व प्रत्येक शब्द दरवेळी आपल्याला नवी अनुभूती देतो, असा भाविकांचा अनुभव आहे. म्हणूनच माऊलींच्या समकालीन संत नामदेव महाराज, ज्ञानेश्वरीचे महत्त्व सांगताना ‘एक तरी ओवी अनुभवावी।’ असे म्हणतात. तर त्यानंतर साडेतीनशे वर्षांनी झालेले पैठणचे संत एकनाथ महाराज ज्ञानेश्वरीचे महती
‘भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी।
कृपा करी हरी तयावरी।।
स्वमुखे आपण सांगे तो श्रीविष्णु।
श्रीगीता हा प्रश्नु अर्जुनेशी।।
तेचि ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे।
भय कळिकाळाचे नाही तया।।...
असा विश्वास व्यक्त करतात. सर्वच संतांनी ज्ञानेश्वरीला सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानले आहे. तीच परंपरा आजही साडेसातशे वर्षानंतर अखंडपणे सुरू आहे. प्रत्येक गावात कुठे ना कुठे ज्ञानेश्वरीचे पारायण, त्यातील ओव्यांवर प्रवचन सुरू असते. आळंदीतील माऊलींचे समाधी मंदिर असो की सिद्धबेट आदी ठिकाणी भाविक पारायण करताना, ज्ञानेश्वरी वाचताना दिसतात. हीच ज्ञानेश्वरी घरोघरी लिहिली जावी, भाविकांना ‘अक्षरवारी’ घडावी याचा पान ४ वर
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने प्रकाशित केलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची पारायण प्रत आणि सर्व ओव्या मावतील इतकी पाचशे पानांची वही ‘अक्षरवारी’ करू इच्छिणाऱ्या भाविकांना दिली जाते. सर्व अध्याय लिहून झाल्यानंतर तो हस्तलिखित ग्रंथ लिहिणाऱ्या भाविकाकडेच ठेवला जातो. या लिखाणातून एक ऊर्जा मिळत असल्याचे अनुभव भाविक सांगतात. ग्रंथ व वही भाविकांपर्यंत स्वयंसेवक वा टपालाने पाठवले जात आहेत.
- जयंत ऊर्फ अप्पा बागल, सचिव,महाराष्ट्र वारकरी महामंडळ
अमेरिका, दुबई, कॅनडा, इटली, मॉरिशस, जपान, जर्मनी, इंग्लंड आदी १९ देशांतील आणि तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू, मध्यप्रदेश, गुजरात आदी १८ राज्यातील भाविकांनी ‘अक्षरवारी’त सहभाग घेतला आहे. सिंधुदुर्ग येथील ९१ वर्षांच्या आजोबा आणि सांगलीतील दिव्यांग भाविक महिलेनेही ज्ञानेश्वरी स्वहस्ते लिहून पूर्ण केली आहे. काहीजण लिहीत आहेत. प्रत्येक भागातील भाविकांचे व्हॉटस्ॲप ग्रुप करून त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे.
- दत्ताभाऊ चिंचवडे, संस्थापक, श्री ज्ञानेश्वरी सेवा समिती
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.