चाकण, ता. १४ : राज्यात गेल्या काळात आलेले चक्रीवादळ आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बाजारात कांद्यांची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. चाकण बाजारात गुरुवारी बाराशे क्विंटल कांद्याची आवक झाली. घाऊक बाजारात कांद्याच्या एका किलोस २० ते ३५ रुपयांचा भाव मिळाला. गेल्या दोन आठवड्यांत कांद्याचे भाव किलोमागे पंधरा रुपयांनी वाढल्याची माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी दिली.
कर्नाटक, राजस्थानमध्येही लाल कांद्याचे गेल्या काळात नुकसान झाले आहे. देशांतर्गत कांद्याची आवक सध्या कमी झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील कांद्याचेही नुकसान झाल्याने उन्हाळी व पावसाळी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्याचा फटका बसल्याने कांद्याचे भाव गेल्या दोन आठवड्यात राज्यातील विविध बाजारात पंधरा ते वीस रुपयांनी वाढले आहेत.
सोलापूर बाजारात कांद्याला प्रति किलोस पन्नास रुपयांचा भाव मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यात कांद्याला प्रति किलोला पंचेचाळीस रुपयांचा भाव मिळत आहे. चाकण बाजारात अद्याप पावसाळी कांद्याची आवक सुरू झाली नाही. बाजारात सध्या उन्हाळी कांद्याची आवक होत आहे. गेल्या दोन आठवड्यांत कांद्याची आवक घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.बाजारात नवा कांदा डिसेंबर अखेरीस विक्रीसाठी येतो. राज्यात पावसाळी व उन्हाळी कांदा भिजल्याने मोठे नुकसान झाल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढत आहे. राज्यातील कांदा सध्या दिल्ली आणि कर्नाटकात विक्रीसाठी पाठविला जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
कांद्याच्या लागवडी सध्या सुरू झाल्या आहेत. आगाप कांदा डिसेंबरअखेरीस किंवा जानेवारीच्या सुरुवातीला बाजारात विक्रीसाठी येईल. निर्यातही अत्यल्प प्रमाणात आहे. अवकाळी पावसाने गेल्या काळात साठवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भावात वाढ झाली आहे.
-प्रशांत गोरे पाटील, व्यापारी, चाकण (ता. खेड)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.