किरकटवाडी : रविवारची सुट्टी, पावसाच्या रिमझिम सरी व पुर्ण क्षमतेने भरलेल्या खडकवासला धरणाचा मनमोहक नजारा पाहण्यासाठी आणि गरमागरम कांदा भजी, ओली भेळ आणि भाजलेले मक्याचे कणीस यांचा आस्वाद घेण्यासाठी बंदी असताना पर्यटकांनी खडकवासला धरण चौपाटीवर काही प्रमाणात गर्दी केलेली दिसली. सिंहगड किल्ल्यावर मात्र वनविभागाने कडक बंदोबस्त ठेवल्याने शुकशुकाट पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला हातावरचे पोट असलेल्या खडकवासला धरण चौपाटी व सिंहगड किल्ल्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पर्यटन सुरु करण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दि. 16 जुलै 2021 रोजी आदेश काढून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व गडकिल्ले तसेच धरणांच्या परिसरात पर्यटन बंदी लागू केलेली आहे. सदर आदेशानुसार खडकवासला, पानशेत, वरसगाव या धरणांच्या व सिंहगड किल्ल्यासह घेरा सिंहगड व डोणजे या गावांपासून एक किलोमीटरच्या परिसरात पर्यटकांनी थांबने, वाहने उभी करणे, गर्दी करणे यांस प्रतिबंध करण्यात आला आहे. पोलीस प्रशासन व संबंधित विभागांना सदर आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना आहेत.
खडकवासला धरण चौपाटीवर सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दर शनिवारी व रविवारी नाकाबंदी करण्यात येते. दंड आकारुन पर्यटकांना माघारी पाठवले जाते, मात्र या रविवारी नाकाबंदी सैल करण्यात आल्याने पुन्हा पर्यटकांनी गर्दी केलेली दिसली. सिंहगड किल्ल्यावर मात्र गोळेवाडी व घाट रस्त्यावरील कोंढणपूर फाटा या दोन ठिकाणी वनविभाने लावलेल्या नाकाबंदीतून एकाही पर्यटकाला गडावर सोडण्यात आले नाही. तसेच जे पर्यटक पायी चढून सिंहगडावर गेले होते त्यांनाही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परत मागे पाठवले.
"दिड वर्षापासून आम्ही व्यवसाय बंद असल्याने आर्थिक अडचणीत आहोत. खाद्यपदार्थ विकताना आम्ही सर्वजण कटाक्षाने मास्क वापरत आहोत. लोकांनाही गर्दी करुन थांबून देत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना आमची कळकळीची विनंती आहे की काही नियम घालून पर्यटन सुरु करावे. आमच्यासारख्या हातावरचे पोट असणाऱ्या अनेकांच्या व्यथा समजून घ्याव्यात, असे खाद्यपदार्थ विक्रेते विनोद देसाई यांनी सांगितले.
याबाबत हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार म्हणाले, "गणेशोत्सव सुरू झाल्याने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया सुरू आहेत. अशा कारवायांमध्ये पोलीस अडकलेले असताना काही कर्मचारी पर्यटकांना रोखण्यासाठी तैणात केले होते. एका ठिकाणची गर्दी कमी करण्यासाठी पोलीस गेले की लोक दुसरीकडे गर्दी करतात. मनुष्यबळ कमी असल्याने नागरिकांनीही समजूतदारपणा दाखवणे आवश्यक आहे."
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.