पुणे - कोरोनाचे रग्ण (Corona Patient) कमी होत असल्यामुळे राज्य सरकार पुण्यातील (Pune) निर्बंध (Restriction) शिथिल केव्हा करणार, याकडे लाखो पुणेकरांचे लक्ष लागलेले असताना, पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र बैठक (Meeting) लांबविली आहे. त्यामुळे व्यापारीही (Traders) संतप्त झाले आहेत. ही बैठक रविवारी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी, त्याबाबत अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
कोरोनाची आढावा बैठक पालकमंत्री पवार दर शुक्रवारी पुण्यात घेतात. शहरातील निर्बंध कमी करण्याचे सूतोवाच पालकमंत्री पवार यांनी दोन आठवड्यांपूर्वी पुण्यात केले होते. परंतु, त्या बाबत अजूनही निर्णय झालेला नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही निर्बंध शिथिल दोन दिवसांत होतील, असे आठ दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यात सांगितले होते. परंतु, त्याबाबतही कार्यवाही झालेली नाही. पुण्यात लाखो व्यावसायिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील दुकाने सायंकाळी चार वाजल्यानंतरही उघडी ठेवण्यास सुरवात झाली आहे. महात्मा फुले मंडईत आंदोलनादरम्यान एका व्यापाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला म्हणून विश्रामबाग पोलिसांनी तब्बल ३० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पुणे व्यापारी महासंघाने गेल्या दोन दिवसांत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याही भेटीगाठी घेतल्या. त्यांनीही शुक्रवारच्या बैठकीत दिलासा देऊ, असे आश्वासन दिले. परंतु, कार्यवाही झालेली नाही.
निर्बंधांतून दिलासा देण्यासाठी महापालिका प्रस्ताव पाठवेल, अशी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी सांगितले होते. परंतु, शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना आयुक्त विक्रमकुमार महापालिका प्रस्ताव पाठविणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनातील विसंवाद पुन्हा एकदा उघड झाला आहे. दरम्यान पुण्यातील नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण (पॉझिटिव्हीटी रेट) ३ टक्क्यांच्या आसपास आहे. त्याची तरी प्रशासनाने दखल घ्यावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.
शहरात कोरोनापूर्व काळात दररोज ४० हजार दुकानदार, ४८ हजार फेरीवाले, ९ हजार हॉटेल- बारचालक यांची सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल होत होती. परंतु, सध्या दुकाने, हॉटेल्स सायंकाळी चार वाजेपर्यंतच उघडी ठेवण्यास परवानगी असल्यामुळे सध्या ही उलाढाल ४० कोटींपर्यंत खाली आहे. त्यामुळे पुणे शहराचे अर्थचक्रच विस्कळीत झाले आहे. त्याची तरी पालकमंत्री पवार यांनी दखल घेऊन लाखो नागरिकांना दिलासा द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.