पुणे : भारत-चीन(China)सीमेवर अरुणाचल प्रदेशात भारतीय सैन्यदलाच्यावतीने स्थानिक नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या भागात विविध विकासकामांच्या माध्यमातून स्थानिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘पंजाब रेजिमेंट बटालियन वीस’ एका पुणेकराच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. या उपक्रमाची अरुणाचल प्रदेश सरकारनेही दखल घेतली आहे.(Punekar ignited the flame of patriotism)
पंजाब रेजिमेंटच्या २०व्या बटालियनकडून कमांडिंग ऑफिसर कर्नल केदार गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली सीमेवरील गावांतील लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा उपक्रम सध्या सुरू आहे. त्याबद्दल अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. बी. डी. मिश्रा यांनी गुप्ते यांच्या बटालियनला नुकतेच गौरविले. गुप्ते हे पुण्यातील अप्पा बळवंत चौक येथील रहिवासी आहे. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण नूमवि शाळेतून झाले. त्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए) लष्करी प्रशिक्षण घेऊन २००३ मध्ये ते सैन्यदलात अधिकारी म्हणून रुजू झाले. गेल्या १८ वर्षांपासून ते लष्करात कार्यरत आहेत.
तसेच गेल्या तीन वर्षांपासून ते या बटालियनचे नेतृत्व करत आहेत. एनडीएच्या प्रशिक्षणादरम्यान ज्या प्रशिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले ते पंजाबचे होते. पंजाब रेजिमेंटने अनेक लष्करी मोहिमांमध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे याच रेजिमेंटमध्ये दाखल होत देशसेवा करण्याचे ठरविल्याचे गुप्ते यांनी सांगितले. देशाच्या ईशान्य सीमेवर चीनमार्फत होत असलेली घुसखोरी, तसेच त्यांच्या सीमा भागात रस्ते व इतर सुविधा निर्माण करण्यावर चीन अधिक भर देत आहे. या घुसखोरीला रोखण्यासाठी आणि या भागातील दुर्गम गावांमध्ये स्थानिकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पंजाब रेजिमेंटच्या बटालियन वीसने आजवर अनेक पावले उचलली आहेत.सीमावर्ती भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी अरुणाचल प्रदेश सरकार आणि भारतीय सैन्यदलाने ‘मॉडेल विलेज’ प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये अंजाव जिल्ह्यातील मुसाई आणि किबिथू या गावांचा समावेश आहे.
याबाबत गुप्ते म्हणाले, ‘‘लष्कराद्वारे जम्मू काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सद्भावना’ राबविण्यात येत असून ईशान्य भारतात ‘ऑपरेशन समारिटन’ अंतर्गत विविध प्रकल्प व कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये सीमावर्ती भागातील स्थानिकांना मार्गदर्शन करणे, त्यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा, शिबिरे, शिक्षण व्यवस्था बळकट करणे आणि व्याख्यानाच्या माध्यमातून तरुणाईला प्रोत्साहित करणे, आदी उपक्रम सुरू आहेत.’’
''सीमावर्ती भागातील नागरिक आर्थिक दुर्बल आणि सोयी सुविधांपासून वंचित असले, तरी त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना आहे. त्यांच्याशी समन्वय साधत सीमा सुरक्षेचे काम बटालियनच्या माध्यमातून सुरु आहे. यामुळे स्थानिक आणि सैन्यदलातील संबंध देखील अधिक दृढ होत आहेत.''
केदार गुप्ते, कर्नल-कमांडिंग ऑफिसर, पंजाब रेजिमेंट बटालियन वीस
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.