अकरावीच्या जागा वाढणार? निकालाच्या वाढलेल्या टक्केवारीचा परिणाम

Students_Admission
Students_Admission

पुणे : दहावीच्या निकालातील उत्तीर्णतेची वाढलेली टक्केवारी पाहता, यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत. परिणामी, सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेता यावे, यासाठी प्रवेश क्षमतेत किमान १० टक्क्यांनी वाढ करण्यासाठी आतापासूनच पावले उचलली जावीत, असे काही महाविद्यालयीन प्राचार्यांचे म्हणणे आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेश नियंत्रण समितीमार्फत सध्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सीबीएसई, आयसीएसई अशा सर्व मंडळाच्या उत्तीर्णतेची टक्केवारी यंदा वाढली आहे. त्याशिवाय राज्य मंडळाने घेतलेल्या दहावीच्या निकालात पुणे विभाग आणि पुणे जिल्ह्याचा निकाल तुलनेने चांगला लागला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही ओघाने वाढ होणार आहे, त्यामुळे समितीने प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी म्हणाले, "अकरावीच्या प्रवेशासाठी महाविद्यालयाला प्रवेश क्षमतेत गेल्यावर्षी १० टक्क्यांनी वाढ मिळाली होती. यंदा एकूणच निकालात वाढ झाल्याने अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ होणार, हे निश्चित. त्यामुळे प्रवेश क्षमतेत वाढ देण्यासाठी आतापासून पावले उचलणे महत्त्वाचे ठरेल."
खरतर अकरावी प्रवेशासाठी प्रवेश अर्जाची संख्या आणि उपलब्ध जागा पाहून काही प्रमाणात जागा वाढवून दिल्या जातात. त्यासाठी समितीमार्फत जागा वाढविण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना कनिष्ठ महाविद्यालयांना करण्यात येतात. मग शहरातील इच्छुक महाविद्यालये समितीकडे त्या संदर्भात प्रस्ताव सादर करतात.  

शिवाजीनगर येथील मॉर्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव म्हणाले,"अधिआधिक विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी प्रवेश क्षमतेत वाढ देणे आवश्यक आहे. त्यासाठी समितीने महाविद्यालयांना प्रस्ताव सादर करण्यास सांगावे. तसेच शहरातील काही नामांकित उच्च माध्यमिक शाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासाठी मुळातच पायाभूत सुविधा आहेत. अशा शाळांनी कनिष्ठ महाविद्यालये सुरु करावीत."

"गेल्यावर्षी अकरावी प्रवेशासाठी १० टक्के जागा वाढवून दिल्या असल्यातरी प्रत्यक्षात तब्बल ३६ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे तुर्तास प्रवेशासाठी जागा वाढवून देण्याचा कोणताही विचार नाही. परंतु प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थी संख्येच्या तुलनेत प्रवेश क्षमता कमी असल्याचे निदर्शनास आले, तर मात्र जागा वाढवून देण्याचा विचार करण्यात येईल,"
- मीना शेंडकर, सचिव, इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समिती

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com