उरुळी कांचन परिसरात कोरोनाचा उद्रेक, रुग्णांची संख्या पोचली... 

corona
corona

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन शहरात मागिल 24 तासांच्या कालावधीत कोरोनाचे नव्याने तीन रुग्ण आढळून आले आहेत. यात एका महिलेसह दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या पंधरावर पोचली आहे. 

उरुळी कांचन शहरात सोमवारी (ता. ६) सायंकाळी एक महिला, तर मंगळवारी (ता. ७) सकाळी दोन तीस वर्षीय तरुण, असे नव्याने तीन  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या तीन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पंधराहून अधिक जणांचे स्वॅब (घशातील द्रव) तपासणीसाठी पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेत पाठवले आहे, अशी माहिती उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी दिली. 

उरुळी कांचन शहरात कोरोनाचे तब्बल पंधरा रुग्ण आढळुन आले आहेत. उरुळी कांचन व परिसरातील दैनंदिन व्यवहार मात्र आपल्या गावात कोरोना येऊच शकत नाही, या अविर्भावात व बिनधास्तपणे चालू आहेत. नागरिक मास्कविना आपआपल्या मस्तीत घराबाहेर पडत आहेत. कोरोना रोखण्याची जबाबदारी शिरावर असलेले ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल विभाग व पोलिस खातेही कोरोनाला प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाय योजनांना कागदोपत्री पूर्ण करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 
शहरातील महात्मा गांधी रोड व आश्रम रोड या दोन प्रमुख रस्त्यावरील गर्दी पाहिली असता उरुळी कांचनमध्ये एकही रुग्ण नसावा, अशी शंका येते आहे. महिनाभरापूर्वी एखादा- दुसरा रुग्ण आढळून आला तरी, कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी ग्रामपंचायत प्रशासन कठोर उपाय योजना करत होते. मात्र, सध्या पंधरा रुग्ण असूनही सर्वच बिनधास्तपणे चालू आहे.

डॉ. सुचिता कदम यांनी सांगितले की, शहर व परिसरात कोरोनाचे तब्बल पंधरा अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे रुग्ण व रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची काळजी ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग संयुक्तपणे घेत आहे. नागरिकांनी विनामास्क घराबाहेर पडू नये, यासाठी कारवाईही चालू आहे. मात्र, नागरिकांनी काळजी घेण्याबाबत आवाहन व जनजागृती करूनही नागरीक पुरेशी काळजी घेत नाहीत, ही बाब खरी आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणे व मास्कचा वापर व्हावा, यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या न कळतपणे संपर्कात आलेल्यांनीही तपासणीसाठी येण्याची गरज आहे. मात्र, नागरिक लपवून ठेवत आहेत. त्यामुळे कोरोनाची साथ वाढतच चालली आहे. 

कारवाई तीव्र करणार 
उरुळी कांचन शहर व परिसरातील कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, नागरिक स्वतःची स्वतः काळजी घेत नाही. त्यामुळे कोरोना वाढतो आहे. बाजारपेठातील नागरिकांची गर्दी कमी करण्याबरोबरच मास्कचा वापर शंभर टक्के व्हावा, यासाठी सध्या प्रयत्न चालू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com