पुणे : गाय, शेण, गोमूत्र आणि त्याच्याशी निगडित उत्पादनांचा वापर ही आपली पारंपरिक संस्कृती आहे. सध्या ही संस्कृती हरवत चालली आहे. घरात येणाऱ्या सर्व आजारांवर हा सर्व गोष्टी गुणकारी आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात किमान एक ते दोन देशी गायी असणे गरजेचे आहे, असे मत बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले.
सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह संचलित गोसंवर्धन महासंघाच्यावतीने घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात राष्ट्रीय गोसंवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी राहीबाई पोपेरे बोलत होत्या. कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, धारिवाल फाउंडेशनच्या शोभा धारिवाल, विश्व हिंदू परिषदेचे दादा वेदक, उद्योजक प्रदीप चोरडिया, शेखर मुंदडा, महेंद्र देवी, येमुल गुरुजी, अतुल सराफ, राजेंद्र लुंकड, संजय मुरदाळे, भाऊराव कुदळे, अशोक टांकसाळे आदी उपस्थित होते.
पोपेरे म्हणाल्या, देशी गाईचे दूध हे केवळ दूध नसून अमृत आहे. शेतात देशी शेणखत वापरल्याने पीक चांगले येते. तसेच ते अन्न खाल्याने आजार होत नाहीत. शेतामध्ये देशी बी हवे, तरच पुढच्या पिढ्या आरोग्यसंपन्न जगतील. यासाठी प्रत्येक गावात देशी बी बँक असायला हवी. डॉ.आशिष पोलकडे, सुनील बेनके यांनी सूत्रसंचालन केले. उमेश पाचलग, महेंद्र देवी यांनी आभार मानले.
गो आधारित उत्पादन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुजरातसह महाराष्ट्रातील परभणी, नांदेड, नगर अशा विविध भागांतून आलेल्या शेतकऱ्यांनी व गो उत्पादकांनी आपली उत्पादने मांडली आहेत. याशिवाय मोफत नाडी परीक्षण, पंचगव्य चिकित्सा देखील आहे. एक नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य खुले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.