पुणे : 'औरंगाबाद नामांतराबाबत कॉंग्रेसची कायम भूमिका राहिली आहे आणि ती आम्ही देखील मांडली आहे. त्यामुले आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना निश्चित पटवून देऊ,' असे सांगत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे शुक्रवारी (ता.८) पुन्हा एकदा स्पष्ट केले. थोरात पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
औरंगाबाद नामांतराबाबत विचारले असता थोरात म्हणाले, "औरंगाबादच्या नामातंराबाबत कॉंग्रेस पक्षाची कायम भूमिका राहिली आहे आणि ती आम्ही मांडली आहे, पण मुख्यमंत्र्यांना नेमके काय म्हणायचे आहे. त्याबाबत आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना निश्चित पटवून देऊ. तसेच यामध्ये औरंगजेब हा विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आणि श्रद्धास्थान आहे, पण प्रश्न असा आहे की, नामांतराच्या बाबतीत जे राजकारण होते. त्यामुळे माणसात भेद निर्माण होतात. ते होऊ नये, यासाठी कॉंग्रेस विरोध करीत असतं, त्यामुळे आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना पटवून देऊ.''
तसेच तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरलेला आहे. त्यानुसार आम्ही काम करीत राहणारच आहोत. जिथे मतभेद आणि गैरसमजाचे प्रश्न आल्यास, आम्ही एकत्र बसतो आणि जे काही असेल त्या बद्दल मुख्यमंत्र्यांना आम्ही पटवून देतो, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
आगामी महापालिका निवडणुकांबाबत बोलताना थोरात म्हणाले, "ते तीन पक्षाचे सरकार असले, तरी आमचा पक्ष वाढविणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही पक्ष वाढविण्याची तयारी करतोच आहे, पण आमचा एकच उद्देश आहे. भारतीय जनता पक्षाचे तत्त्वज्ञान, कार्यपद्धतीला देखील महाविकास आघाडी सरकारचा विरोध आहे. त्यामुळे जरी आम्ही आमची तयारी करीत असलो. तरी भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून कसे दूर ठेवू याचा विचार महाविकास आघाडी म्हणून देखील आम्ही करणार आहे.'' प्रदेशाध्यक्षपदाबाबत विचारले असता, त्यावर काही न बोलता ते निधून गेले.
(Edited by: Ashish N. Kadam)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.