पुणे : सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेसंदर्भात काय कार्यवाही करावी, याबाबत सरकारकडून सुधारित अभिप्राय मागविण्यात आले होते. त्यावर सरकारने अखेर ५ जुलै रोजी शासन निर्णय जाहीर केला असून त्यानुसार पुढील कार्यवाही प्राधान्यक्रमाने करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. परंतु केवळ कागदीघोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष कार्यवाही करून परीक्षेच्या तारखा, रखडलेले निकाल जाहीर करावेत, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याचा तणावामुळे पुण्यात स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्यानंतर, लोकसेवा आयोगासह राज्य सरकारच्या कामकाजावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातून ताशेरे ओढले गेले. त्यानंतर सरकारने जागे होत, लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केले. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईत मंगळवारी (ता.१३) बैठक घेणार असल्याचे यापुर्वीच जाहीर करण्यात आले. किमान या बैठकीत तरी ठोस निर्णय होईल, या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत.
दरम्यान आयोगाने स्वप्निल लोणकर याची आत्महत्येचे दु:ख व्यक्त करत पुढील कार्यवाही प्राधान्य क्रमाने होईल, असे आश्वासन दिले आहे. कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये देशात लॉकडाऊन जाहीर झाला. कोरोनाजन्य परिस्थिती तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने परीक्षांचे निकाल लावण्यात आले नव्हते. तसेच काही निकाल सुधारित करणे आवश्यक झाले आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने विविध परीक्षांबाबत कार्यवाहीबाबत सरकारकडे सुधारित अभिप्राय मागविला होता. त्यानुसार सरकारने ५ जुलै रोजी शासन निर्णय दिला असून त्यानुसार कार्यवाही करणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
- सहायक वन संरक्षक, गट-अ, वनक्षेत्रपाल गट-ब पदासाठी १५ सप्टेंबर २०१९ रोजी ‘महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-२०१९’ची लेखील परीक्षा झाली. त्याचा निकाल ३० जानेवारी २०२० रोजी जाहीर झाला. परंतु भरती प्रक्रियेसंदर्भात ५ जुलै २०२१ रोजी सरकारकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित निकाल जाहीर करण्याचे कामकाज सुरू
- सहायक अभियंता, विद्युत, गट-ब, श्रेणी-२ संवर्गातील १६ पदांसाठी २४ नोव्हेंबर २०१९ रोजी ‘महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०१९’ घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल २३ जून २०२० रोजी जाहीर झाला. या पदभरतीमध्येही सरकारच्या नवीन निर्णयातील (५ जुलै) मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित निकाल जाहीर करण्याचे कामकाज सुरू
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.