Dr. Hamid Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोलकर खुनातील सूत्रधारांना केव्हा पकडणार?

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक अध्यक्ष दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणाला येत्या २० ऑगस्टला १० वर्ष पूर्ण होत आहेत.
Dr. hamid Dabholkar
Dr. hamid Dabholkarsakal

पुणे - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक अध्यक्ष दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणाला येत्या २० ऑगस्टला १० वर्ष पूर्ण होत आहेत. या दहा वर्षाच्या कालावधीत उच्च न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला अनेक वेळा फटकारल्यानंतर केवळ डॉ. दाभोळकरांच्या संशयित मारेकऱ्यांना पकडले आहे.

परंतु या खून प्रकरणातील सूत्रधार अद्याप फरारच आहेत. या सूत्रधारांना केव्हा पकडणार, असा संतप्त सवाल डॉ. हमीद दाभोलकर यांनी शुक्रवारी (ता.११) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना केला.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आतापर्यंत या खून प्रकरणात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोन मारेकऱ्यांना अटक केले असून या दोन आरोपींवर न्यायालयात खटला चालू आहे.

या खून प्रकरणाला दहा वर्षे पूर्ण झाली तरी, अद्याप सूत्रधार का पकडले गेले नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित करत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या सर्वांचे खून हे एका सामाईक उद्दिष्टाने आणि एकाच विशिष्ट कट्टरपंथीय संघटनेच्या लोकांकडून करण्यात आल्याचे या चारही खुनांच्या तपासातून आणि आजपर्यंत दाखल झालेल्या आरोपपत्रांमधून पुढे आले असल्याचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी ‘अंनिस’चे पुणे शहर कार्याध्यक्ष अनिल वेल्हाळ, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी आणि बाळकृष्ण लोंढे आदी उपस्थित होते.

डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘हे सरकार डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील फरार सूत्रधारांवर विशेषतः विशिष्ट कट्टरपंथीय संघटनेच्या लोकांवर ठोस कारवाई करताना दिसत नाही. ही बाब निषेधार्ह आहे. डॉ. दाभोलकर यांच्या संशयित मारेकऱ्यांचे दाभोलकर यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते.

केवळ त्यांच्या विचारांना विरोध करण्यासाठी भडकावले गेल्याने मारेकऱ्यांनी हा खून केला असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मारेकऱ्यांइतकेच त्यांची डोकी नियोजनबद्ध पद्धतीने भडकवणारे सूत्रधारदेखील तेवढेच जबाबदार आहेत. जोपर्यंत हे सूत्रधार मोकाट आहेत, तोपर्यंत विवेकवादी लोकांना असलेला धोका कायम आहे. त्यामुळे यासाठी जास्त वेळ न घालवता या सूत्रधारांवरती कारवाई करण्यात यावी, अशी ‘अंनिस’ची मागणी आहे.’

गेल्या चार वर्षांपासून ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क या संस्थेच्या वतीने दरवर्षी २० ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून पाळला जात आहे. याअंतर्गत झारखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश यासारख्या दुर्गम राज्यांपासून ते दिल्ली, पंजाब, हरियाना, आंध्र प्रदेश आदींसह देशातील पंधराहून अधिक राज्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येतो. शिवाय डॉ. सुनीलकुमार लवटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पंधरा पुस्तके ही हिंदी भाषेमध्ये भाषांतरित झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com