Video : क्वारंटाइन की मरण टाइम ? विश्रांतवाडी केंद्रातील महिला करणार अन्नत्याग

lunch1.jpg
lunch1.jpg

वडगाव शेरी (पुणे) : विश्रांतवाडीतील- फुलेनगरमध्ये असणाऱ्या संत ज्ञानेश्वर वसतिगृह येथील क्वारंटाइन केंद्रातील अपुऱ्या सुविधा आणि जेवणाचा कमी दर्जा याविषयी येथील रुग्णांनी एकत्र येत प्रशासनाला संतप्तपणे जाब विचारला. या केंद्रातील समस्या सुटल्या नाही तर आम्ही अन्नत्याग करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

फुलेनगर येथील क्वारंटाइन केंद्रावर आज दुपारी उशिरा जेवण आले. त्यातील काही डब्यांतील जेवण आंबलेलं होते. त्यामुळे दाखल रुग्णांचा संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी पायऱ्यांवर एकत्र येत प्रशासनाला जाब विचारला. या केंद्रावर पूर्व पुण्यातील 314 व्यक्ती क्वारंटाइन केल्या आहेत. त्यात 20 लहान मुले आहेत. तर अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. अनेकांना अगोदरच काही आजार आहेत. 

क्वारंटाइन केंद्रात दाखल व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, येथे तपासणीसाठी आलेल्या किंवा डॉक्‍टरांनी पाठविलेल्या रुग्णांना हात धुण्यासाठी साबण किंवा सॅनिटायझर देण्यात येत नाही. तपासणीसाठी येणा-यांची संख्या जास्त आहे व बैठक व्यवस्था अपूर्ण त्यामुळे सामाजिक अंतर राखले जात नाही. तसेच येथे रुग्ण ने आण करणाऱ्या बसेसमध्ये एकावेळी 12 ते 14 रुग्णांची ने आण केली जाते. त्यातील काही रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याचे दुसऱ्या दिवशी कळते. ती बस देखील तत्काळ, निर्जंतुक होत नाही. तपासणी झाल्यावर रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येईपर्यंत एकाच रूममध्ये तीन चार लोकांना ठेवले जाते. शौचालय व बाथरूममध्ये साबण पुरविले जात नाहीत. 

रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार, "विश्रांतवाडी येथे बऱ्यापैकी सोय असली तरी अजून सुधारणा हवी आहे. सकाळचा नाश्‍ता कमी येतो. जेवण उशिरा येते किंवा वेळेवर मिळत नाही. चहा दिला जात नाही. जेवण कमी असल्याने तरुण व्यक्ती व लहान मुलांची भूक भागत नाही. प्रतिकार शक्ती वाढण्या ऐवजी कमी होत आहे. म्हणूनच क्वारंटाइन की मरण टाइम असे म्हणावे लागत आहे. हा प्रकार नगरसेवक राहुल भंडारे यांनी पालिका आयुक्तांच्या लक्षात आणून दिला असून भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी येथील अपुऱ्या सुविधा दूर करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. 

याबाबत सदर केंद्राची जबाबदारी असलेले पालिका अधिकारी विजय भुतकर म्हणाले, "दाखल रुग्णांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. आम्ही डोळ्यात तेल घालून सर्व सुविधा देत आहोत. दुपारी जास्त ऊन असल्यामुळे आणि जेवण उशिरा आल्यामुळे कदाचित जेवणाच्या काही डब्यातील अन्न नासले असण्याची शक्‍यता आहे. लोकांना एखाद्या गोष्टीचा बाऊ करण्याची सवय आहे. लहान मुलांना आम्ही दूध ही पुरवीत आहोत.' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com