

Foreign Investment
esakal
भूषण महाजन
kreatwealth@gmail.com
जुलै महिनाभर सुरू असलेल्या अस्थिरतेनंतर आपल्या शेअर बाजाराने अखेर सकारात्मक संकेत दिले आहेत. परदेशी गुंतवणुकीचा ओसरलेला विक्रीचा दबाव, कंपन्यांचे सुधारलेले निकाल आणि भारताकडे पुन्हा वाढणारे जागतिक आकर्षण यामुळे पुढील काळात बाजारासाठी आशावाद निर्माण झाला आहे. मात्र, या प्रवासात संयम, योग्य शेअरची निवड आणि दीर्घकालीन दृष्टिकोन यांनाच सर्वाधिक महत्त्व राहणार आहे.
गेल्या संपूर्ण अस्थिर जुलै महिन्यात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांच्या संयमाची चांगलीच परीक्षा घेतली. कधी जोरदार वाढ, कधी तीव्र घसरण आणि सततचा अनिश्चित कल या हेलकाव्यांमुळे बाजाराची नेमकी दिशा काय आहे, हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला असेल. प्रत्येक आठवड्यात आशेचा किरण दिसायचा; पण लगेचच निराशेची छाया त्यावर येऊन बसायची. पण म्हणतात ना, ‘ज्याचा शेवट गोड, त्याचं सारंच गोड!’ महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात बाजाराने सकारात्मक वळण घेतले. ‘निफ्टी’ निर्देशांक ३१ जुलै रोजी २४,३८३ अंशांवर बंद झाला. महिनाभरात तब्बल २.२५ टक्क्यांची वाढ झाली. ही वाढ फार मोठी नसली, तरी तिचे महत्त्व वेगळे आहे. कारण बाजाराच्या मानसिकतेत स्पष्ट बदल दिसू लागला आहे. विक्रीचा दबाव कमी झाला, तर खरेदीचा आत्मविश्वास वाढला.