भाजी घ्या, भाजी! (ढिंग टांग!)

भाजी घ्या, भाजी! (ढिंग टांग!)
भाजी घ्या, भाजी! (ढिंग टांग!)

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938, श्रावण शुद्ध द्‌वादशी.
आजचा वार : स्वातंत्र्यवार!
आजचा सुविचार : कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी।।


नमो नम: नमो नम: नमो नम: (105 वेळा लिहिणे.) सकाळी उठलो तेव्हापासून अंगात वीज सळसळल्यासारखे होत आहे. मधूनच उजव्या हाताची मूठ आपोआप वळते आणि हात वर जातो. छातीवरल्या नमोजाकिटाची बटणे तटातटा तुटतात. अंगात वीरश्री संचारल्यासारखे होते. रक्‍त उसळते. मनातली राष्ट्रीय भावना प्रखर आणि प्रबळ होते.

आमचे गुरुवर्य पू. नमोजीहुकूम यांनी हा संस्कार केला आहे. त्यांच्या भाषणाच्या अखेरीला ते दोन्ही मुठी हवेत उंचावून "भारतमाता की जय‘ असे ओरडायला लावतात. त्यांच्या सभेनंतर तर मी अंगावरचे नमोजाकिट काढून हातातच धरतो. एक बटण शिल्लक राहात नाही. त्यांच्या सभेला जायची वेळ आली तर हल्ली मी सुईदोरा पाकिटात घेऊनच जातो. बटणे तुटली की लागलीच (मांडवापाठीमागे जाऊन) लावून घ्यायची. डोक्‍याला ताप नाही. सुईत दोरा मात्र वेगाने ओवता आला पाहिजे! मी त्यात भयंकर एक्‍सपर्ट आहे, हे आख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे!! असो.

आज तर स्वातंत्र्यदिन! माझा हात जवळजवळ हवेतच आहे... सकाळी उठलो. सारी आन्हिके आटोपल्यावर पहिले मूठ हवेत उगारून " भारत माता कीऽऽऽ...‘ असे ओरडलो. पाठोपाठ "जय‘ असेही स्वत:च ओरडलो. मग सवयीने (घोषणा देत) सैपाकघरात डोकावलो. म्हटले चहाचा अंदाज घ्यावा!
""भारतमाता की जय!,‘‘ आम्ही वीरश्रीने ओरडलो. न पुरत्याला पुढे "स्वातंत्र्यदिन चिरायु होवो‘ अशीही घोषणा देऊन मोकळे झालो. सौभाग्यवतींनी थंड नजरेने बघत विचारले, ""हे काय?‘‘
""कुठे काय? छे!,‘‘ आम्ही मूठ वळलेला हात खांद्यापलीकडे नेत आळस देण्याचा अभिनय केला.
""कुणाचा स्वातंत्र्यदिन?‘‘ थंड आवाजात पुन्हा विचारणा.
""आज आपला सर्वांचा स्वातंत्र्यदिन नाही का? स्व. श्‍यामाप्रसाद मुखर्जी, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, डॉ. हेडगेवार अशा दिग्गजांच्या नेतृत्वाखाली देशउभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी तनमनधन वेचिले...,‘‘ पण माझे भाषण पूर्ण होऊ शकले नाही. सौभाग्यवतींच्या जळजळीत नजरेला लसणीच्या फोडणीचीच उपमा द्यावी लागेल! घशात आवंढा आला.
""आज काय स्पेशल आहे?‘‘ कढईत डोकावत (पक्षी : विषय बदलत) आम्ही विचारले.
"" भारंगीची पालेभाजी आहे...खा!!,‘‘ कुत्सितपणे सौभाग्यवती.
""भारंगी? शी:!! यापेक्षा मी कोबी खाईन!‘‘ स्वतंत्र बाण्याने आम्ही. वास्तविक कोबीच्या लागवडीवर बंदी आणण्यासाठी काय करता येईल, याचा विचार माझ्या डोक्‍यात गेली दोन वर्षं घोळतोय.
""तुम्हीच आणलीयेत काल! आता खा!!,‘‘ सौभाग्यवती.

...आत्ता आठवले. काल मंत्रालयाच्या आवारात आठवडी बाजार लावला होता. तिथल्या संत सावता माळी स्टॉलवर काहीतरी पालेभाजी ठेवलेली होती. शेजारी शिवसेनेचे अरविंद सावंत उभे होते. श्रावणातल्या रानभाज्यांचे महत्त्व ह्यावर काहीतरी बोलत होते. फोडशी, भारंगी, कुर्डू, टाकळा, कंटोली असली काही नावे त्यांनी घेतली. कर्म माझे! मी त्यांना "ढेमसांची भाजी खाल्लीत का कधी? ए-वन लागते!‘ असे सांगून माफक सूड काढला. असो. ""ही भाजी घ्या! कांद्यावर परतून खाल्लीत, तर बारा हत्तींचं बळ येतं!,‘‘ कुणीतरी म्हणाले. विषय संपवावा म्हणून त्यातल्या दोनचार जुड्या मी तत्काळ उचलल्या. किती झाले? असे भाजीवाल्यास विचारले. त्याने चोवीस रुपये सांगितले.

पाकिटासाठी खिशात हात घातला आणि ब्रह्मांड आठवले. पाकिट विसरलो होतो. खिशात एक दमडी नव्हती. आमचा चेहरा पाहून अरविंद सावंतांनी मुकाट्याने स्वत:चे पाकिट काढले आणि दहाच्या तीन नोटा काढून दिल्या. ""लौकर परत करा!‘‘ असे हळू आवाजात पुटपुटले. मागल्या खेपेला स्वस्त भाजीचा स्टॉल लावला होता, तेव्हाही त्यांनीच आम्हाला बेचाळीस रुपये उसने दिले होते.

एकंदरीत हा मुख्यमंत्री कायम कडका आहे, अशी इमेज होणार असे दिसते! चालायचेच! खिशात पैसे नसताना नको असलेली भाजी विकत मिळण्यालाच म्हणतात स्वातंत्र्य! ते चिरायु होवोच!! जय हिंद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com