

Mumbai Pune Expressway Traffic Jam
esakal
द्रुतगती महामार्ग हे दळणवळण व्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक. वाहतूकच नाही तर अवघी अर्थव्यवस्था अशा महामार्गांवर विसंबून असते. त्याबाबत तातडीने सुधारणा करायला हव्यात.
सर्वसाधारण स्थितीत एखादी व्यवस्था चांगली आहे की नाही, याचे मूल्यमापन होऊ शकत नाही; तर आपत्कालात, अचानक उद्भवलेल्या संकटाच्या परिस्थितीत ती कशी काम करते, त्यावेळेसच तिचा खरा कस लागतो. हे लक्षात घेतले तर दोन महानगरांना जोडणाऱ्या आणि हजारो वाहनांची रोज ये-जा करणाऱ्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मंगळवारी जे काही घडले त्याने आपल्याकडच्या वाहतूकव्यवस्थेची लक्तरे उघडी पडली, हे मान्य करावे लागेल. वाहतूक पूर्वपदावर येण्यास तब्बल ४० ते ४५ तास लागावेत, ही नामुष्कीची बाब आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर उलटून झालेल्या भीषण अपघाताने या मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. हा महामार्ग आता केवळ ‘टोल’वसुलीचे केंद्र आणि मृत्यूचा सापळा बनला आहे की काय, असा संतापजनक प्रश्न उपस्थित होत आहे.