भारतीय राजकारणातून गुन्हेगारीचे संपूर्ण उच्चाटन व्हावे, हे खरोखरच एक उदात्त उद्दिष्ट आहे. पण त्याने भारून जाऊन सरकारने तातडीने हे पाऊल उचलले, की त्यामागे काही राजकीय आडाखे आहेत, हा प्रश्न टाळता येणार नाही.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा देशापुढील एक ज्वलंत प्रश्न असून तो सोडविण्यासाठी जे जे वैधानिक, राजकीय आणि आनुषंगिक उपाय योजावे लागतील, ते योजलेच पाहिजेत. भारतीय लोकशाहीविषयी आस्था असलेल्या प्रत्येकालाच या उपाययोजनांची निकड पटेल, यात शंका नाही.