स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे बुद्रुक.
वेळ : श्रमपरिहार संपल्यानंतरची.
चि. विक्रमादित्य : (खोलीच्या दारावर टकटक करत) हाय देअर, मे आय कम इन बॅब्स?
उधोजीसाहेब : (अंथरुणावर पडल्या पडल्या) नोप, प्लीज डु नॉट डिस्टर्ब मी!! आय नीड सम रेस्ट!!
विक्रमादित्य : (आठवण करुन देत) हे लंडन नाही, बॅब्स! वी आर बॅक इन बँड्रा!
उधोजीसाहेब : (डोळे मिटल्या मिटल्या) मला माहीत आहे! पण माझा जेटलॅग अजून गेलेला नाही! शिवाय किती उकाडा आहे इकडे…छे!
विक्रमादित्य : (परदेश दौऱ्याच्या आठवणी काढत) धमाल आली ना युरोपात? लंडनमध्ये रस्त्यात भेटणारा प्रत्येक जण विचारत होता, ‘‘सर, टुमच्या सारकार खधी येणार? पान्नास खोक्के, नॉट ओख्के!!’’…हाहा!!
उधोजीसाहेब : (प्रवासाचे क्षण आठवत) खरंच! किती सुंदर होते ते पंधराएक दिवस! तीन वर्ष नुसतं बांदऱ्यात राहून वैतागलो होतो! युरोपात मनमोकळं फिरता आलं! किती लोक भेटले! आपल्या आडनावामुळे काही लोक ब्रिटिशच समजतात, ‘‘हौ आर यु मि. थॅकरेऽऽ…!!
विक्रमादित्य : (डोळे मिचकावत) एक गोरा साहेब तर तुम्हाला डॉ. थॅकरे म्हणाला!!
उधोजीसाहेब : (वैतागून) ते आपल्या संजयाजी राऊतांचं काम!! डब्ल्यूएचओवाले माझा सल्ला घेतात, असं त्यांनीच उठवून दिलं होतं! लंडनहून परत यावंसंच वाटत नव्हतं! पण काय करणार? यावंच लागलं!
विक्रमादित्य : (शक्कल लढवत) आपण लंडनला शाखा काढावी का?
उधोजीसाहेब : (पेंगुळलेल्या अवस्थेत) इथल्या शाखा बंद पडताहेत! लंडनला कसली काढता? जाऊ दे ते…मला आराम करु दे!!
विक्रमादित्य : (उत्साहानं) काय हे? मी लागलोसुद्धा कामाला! त्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मी नव्या दमाने सज्ज झालो आहे! उद्या त्या गद्दारांच्या खोके सरकारचा पहिला बर्थ डे आहे!!
उधोजीसाहेब : (गद्दारांचं नाव काढताच ताडकन उठून बसत) पाजी, हरामखोर, नतद्रष्ट, फितुरांची फौज…कोथळा बाहेर काढीन! कुठायत ते गद्दार, आत्ता समोर आणा, एकेकाला लंबे करतो!!
विक्रमादित्य : (धोरणीपणाने) सबूर सबूर!! कमॉन बॅब्स…! बी अ स्पोर्ट! आपल्याला अजून बरीच कामं करायची आहेत! फॉरेन टूरवर असताना तुम्ही काय काय प्लॅन सांगितले होते…आठवतंय ना?
उधोजीसाहेब : (हात उडवत) परदेशातलं परेदशात राहिलं! इकडं सगळं वेगळंच घडतंय! आपण सुट्टीवर फिरायला गेलोय, हे बघून पुन्हा काही गद्दारांनी डाव साधलान! पंधरा दिवस परदेशात काय गेलो, इथं होत्याचं नव्हतं झालं…!!
विक्रमादित्य : (पोक्तपणाने) होत्याचं नव्हतं, आधीच झालं होतं! पण आता आपल्याला नव्हत्याचं होतं करायचं आहे!!
उधोजीसाहेब : (पुन्हा आडवे होत) करु करु!! काय घाई आहे?
विक्रमादित्य : (उतावळेपणानं) घाई आहे, बॅब्स, घाई आहे! आपण सुट्टीवर श्रमपरिहारासाठी गेलो; पण आपले शत्रू इथेच कारस्थानं करत होते! एकही लेकाचा परदेशात गेला नाही! (एकदम काहीतरी आठवून) बाय द वे, बॅब्स, भाकरी फिरवणं म्हंजे एग्झॅक्टली काय करतात हो?
उधोजीसाहेब : (समजावून सांगण्याचा प्रयत्न करत) कसं सांगू? अशी भाकरी असते, ती तव्यावर टाकायची! आणि गोलगोल फिरवायची! सोप्पंय तसं!!
विक्रमादित्य : (उत्साहाने) बॅब्स, आपण पण फिरवूया ना भाकरी!!
उधोजीसाहेब : (खोल आवाजात) पीठ नाही उरलं रे तेवढं!! भाकरीसाठी पीठ लागतं!
विक्रमादित्य : (निरागसपणाने) मग व्हॉट अबाऊट अ केक? भाकरी नाही तर आपण केक तरी फिरवू या!
उधोजीसाहेब : (डोक्यावरुन पांघरुण घेत) जय महाराष्ट्र!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.