

Siddaramaiah and DK Shivakumar Power Struggle
esakal
केरळमध्ये काँग्रेसनं सत्ता मिळवली. तमिळनाडूत अनेक दशकांनी काँग्रेसला सत्तेत स्थान मिळाले. यासोबतच विरोधी आघाडीत काँग्रेसला दुय्यम स्थान देऊ पाहणारे द्रमुक, तृणमूल काँग्रेस यांचा दणदणीत पराभव झाला. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या पक्षालाही झटका बसला आहे. देशात भाजप लखलखतं यश मिळवताना प्रादेशिक पक्ष कमुकवत होत आहेत आणि लोकशाहीत विरोधाची स्पेस संपत नाही. एकेकाळी ज्या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसचा मताधार खेचून घेत आपापल्या राज्यात ताकद कमावली, ते कमजोर होताना कदाचित ही जागा भरण्याची संधी काँग्रेसला मिळू शकते. राजकारणातील हा ताजा बदलही काँग्रेसच्या नेतृत्वाला पक्षांतर्गत निर्णय घेताना आत्मविश्वास पुरवणारा ठरतो आहे.
कर्नाटक राज्यातच आता कॉँग्रेसची सत्ता आणि निवडणुका जिंकण्यासारखी संघटनात्मक ताकद उरली आहे. अशावेळी कोणत्याही निर्णयानं हे उरलं सुरलं सामर्थ्यही धोक्यात येऊ नये, यासाठी कॉँग्रेसचं नेतृत्व कोणतीही गोष्ट थंडा करके खाओ याच मानसिकतेतून पाहत आली आहे, मात्र अलीकडं नेतृत्वानं काही ठोस बदलाकडे जायचं ठरवलेलं दिसतं. केरळममध्ये सतीशन यांच्याकडं नेतृत्व सोपवणं असो, तमिळनाडूत दीर्घकाळचा सहकारी पक्ष द्रमुकची साथ सोडून अभिनेता विजयच्या पक्षासोबत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय असो, यातून हेच दिसत होतं. त्या पाठोपाठ कर्नाटकात मागची अनेक वर्षे चाललेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील स्पर्धेत अखेर शिवकुमार यांच्या बाजूनं पक्षश्रेष्ठींनी वजन टाकलं. उत्तरेत बदलाला सामोरे जाताना कच खाण्यातून बसलेल्या झळांच्या पार्श्वभूमीवर दक्षिणेत कॉँग्रेसनं नेतृत्वाच्या नव्या पिढीकडे सूत्र सोपवायला सुरुवात केली आहे. ते करताना केंद्रात सत्ता असलेलं हायकमांड आणि सत्ताहीन हायकमांड यांच्यातील फरक स्पष्टपणे दिसतो. कधीतरी दिल्लीतून फतवा आला, की मुख्यमंत्री खुर्ची सोडायचे आणि दिल्लीनं ठरवलेल्या नावावर बिनबोभाट शिक्कामोर्तब व्हायचं. आता ही स्थिती भाजपमध्ये आहे आणि काॅंग्रेसला नेतृत्व बदलासाठीही राज्यातील नेत्यांची समजूत काढावी लागते, तडजोडीही कराव्या लागतात. हा फरकही कर्नाटकातील सिद्धरामय्या ज्या रीतीनं अडून बसले आणि पक्षाला त्यांची समजूत काढत राहावं लागलं त्यातून दिसतं. नेतृत्वाची संधी मिळालेल्या डीके यांच्यापुढं दोन वर्षांनी येऊ घातलेल्या निवडणुकीत राज्य राखण्याचं मोठंच आव्हान आहे.