बाह्य सृष्टी... आंतदृष्टी

Temple
Temple

भारतातली जुनी दगडी बांधणीची मंदिरं बघायला मला खूप आवडतं. कुठलीही आधुनिक यंत्रसामग्री हाताशी नसताना, केवळ छिन्नी-हातोड्याच्या साह्यानं भारतीय मूर्तिकारांनी, स्थापत्यतज्ज्ञांनी दगडाला बोलतं केलं. अनुपमेय अशी शिल्पं घडवली. वेरूळच्या एका अखंड कातळातून तीनमजली कैलासलेणं हे अप्रतिम मंदिर कोरून काढण्याइतकी या अनाम कलाकारांची प्रतिभा उत्तुंग होती.

अगदी आजही हजार, दीड हजार वर्षानंतर, उन्हा-पावसाचे, काळाचे, धर्मांध मुसलमानी आक्रमकांचे घाव सोसून ही मंदिरं तशीच ताठ उभी आहेत. विशेषतः दक्षिण भारतातली आजही उभी असलेली मंदिरं तर खूपच सुंदर आणि भव्य-दिव्य अशी आहेत. पांड्यांची मदुराई, चोल राजांनी बांधलेलं तंजावरचं ‘पेरिय कोविल’ म्हणजे मोठं देऊळ, चालुक्यांची वातापी, काकतीय राजांनी उभी केलेली वारंगळची मंदिरं, विजयनगर साम्राज्याची अद्भुत राजधानी हम्पी...किती म्हणून नावं घ्यावीत? असं एखादं जुनं पाषाणमंदिर बघताना मी तर पार भारावूनच जाते.

आयुष्यात कधीही मंदिरात गेलेली नाही अशी हिंदू व्यक्ती विरळाच; पण आजकाल आपण मंदिरात दर्शनाला जातो तेव्हा घाई-गडबडीत रांगेत राहून गाभाऱ्यापाशी जातो, आतल्या मूर्तीचं क्षण, दोन क्षण दर्शन घेतो, हात जोडतो आणि पुजाऱ्यानं दिलेला तीर्थ-प्रसाद घेऊन बाहेर पडतो. अगदी भाविक हिंदू लोकदेखील, मंदिराची रचना एका विशिष्ट पद्धतीनंच का केलेली असते, मंदिराची शैली कशी ओळखायची, मंदिरबांधणीचा काळ कोणता, मंदिर कुणी व का बांधलं, त्या मंदिरातल्या शिल्पांमागच्या कथा काय आहेत याविषयी पूर्णपणे अनभिज्ञ असतात. गाभाऱ्यातल्या देवाला नमस्कार करणं इतकाच बहुतेक भाविकांचा उद्देश असतो; पण मंदिर म्हणजे केवळ गर्भगृह आणि त्यातली मूर्ती नव्हे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या पूर्वजांनी जेव्हा अथक् प्रयत्नांनी इतकी मोठी मंदिरं बांधली तेव्हा त्या संपूर्ण वास्तूमागं एक फार मोठा धर्मविचार होता. मंदिराच्या वास्तूतल्या विविध मूर्ती, मंदिराचे रंगमंडप, द्वारशाखा, शिखर, गर्भगृह, प्रदक्षिणापथ असे विविध भाग, मंदिरावर कोरलेली प्रतीकं, शिलालेख, विविध शिल्पं या प्रत्येकाचं एक विशिष्ट प्रयोजन होतं.मंदिर हे देवाचं पृथ्वीवरचं आलय तर आहेच; पण मंदिर ही एक फार महत्त्वाची सामाजिक संस्थासुद्धा आहे. मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना धर्मविचार सोपेपणानं समजावा, आपली संस्कृती, आपलं धर्मज्ञान सर्वसामान्य माणसांना सहज कळावं यासाठी मंदिरांचं बांधकाम एका विशिष्ट पद्धतीनं केलं जात होतं. अगदी आजही भारतात नवीन मंदिरं बांधताना या सर्व गोष्टींचा विचार करूनच मंदिरांचं बांधकाम केलं जातं. अयोध्येत बांधण्यात येणारं भव्य राममंदिर हे प्राचीन मंदिरस्थापत्याचा विचार करूनच बांधलं जाणार आहे.

"खरं तर कुठल्याही अभिजात कलेप्रमाणे मंदिरस्थापत्यकलेचीही एक परिभाषा असते. अभिजात संगीत समजून घ्यायला जशी त्याची परिभाषा आधी समजून घ्यावी लागते, तसंच मंदिर बघतानाही तिथलं स्थापत्य समजून घ्यायला शिकावं लागतं. मात्र, आपल्या शिक्षणक्रमात कलास्वाद या विषयाला स्थान नाही आणि त्यात आपण चुकूनमाकून ‘आर्ट ॲप्रिसिएशन’च्या नावाखाली चालवलेल्या अभ्यासक्रमांना गेलोच तर तिथं भारतीय शिल्पकला सोडून जगातल्या इतर कलाप्रकारांबद्दलच जास्त शिकवतात."

मी भारतीय शिल्पकलेचा आस्वाद-आनंद घ्यायला शिकले; कारण, एकतर मुळात शिल्पकला, भारतीय तत्त्वज्ञान आणि आपल्या पुराणकथा व इतिहास या विषयांची मला आवड होती आणि नंतर गो. बं. देगलूरकर सरांसारख्या या क्षेत्रातल्या दिग्गज माणसाच्या सहवासात आल्यामुळे. पुढं भारतभर भ्रमण करताना जसजशी प्राचीन मंदिरं शोधत गेले तसतशी मी मंदिरस्थापत्य या विषयाच्या जास्त जास्त प्रेमात पडत गेले.

आपल्या मंदिरांमधून जेव्हा भव्य-दिव्य अशी पौराणिक कथांवरची शिल्पं कोरली गेली तेव्हा त्यांचं प्रयोजन केवळ देव-देवतांपुढं लोकांनी नतमस्तक व्हावं एवढंच नव्हतं. धार्मिक श्रद्धा जोपासण्याबरोबरच लोकांना रामायण-महाभारत या महाकाव्यांबद्दलची माहिती मिळावी, त्यांना आपल्या धर्माचं शिक्षण मिळावं, भोवतालचं जग, प्राणिसृष्टी, झाडं-झुडपं, तत्कालीन लोकसंस्कृती, वेशभूषा, साहित्य, पर्यावरण अशा सर्व गोष्टींचं दर्शन लोकांना व्हावं असा मंदिर निर्मिणाऱ्या लोकांचा हेतू असायचा. मंदिरात येताना माणसानं बाह्य सृष्टीकडे लक्ष द्यावं आणि आत गाभाऱ्यात मात्र पूर्णपणे अंतर्मुख व्हावं आणि सर्व लक्ष देवावर केंद्रित करावं असा काहीसा भाव मंदिरनिर्माणकर्त्यांच्या मनात असावा. म्हणूनच अगदी कामशास्त्रापासून ते प्राणिसृष्टीपर्यंतची शिल्पं आपल्याला जुन्या मंदिरांच्या बाह्य भिंतींवर दिसू शकतात; पण आतला गाभारा मात्र अगदी साधा आणि अनलंकृत असतो. केवळ आराध्यदेवतेची मूर्ती आणि तेलाचे मंद तेवते दिवे इतकंच गर्भगृहात असावं असा शिल्पशास्त्राचा संकेत आहे आणि दक्षिण भारतात तो संकेत आजही कटाक्षानं पाळला जातो.

ईश्वरोपासनेसाठी शैलगृहं बांधण्याची भारतीय परंपरा फार प्राचीन आहे. अगदी इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात डोंगरात-कातळात कोरलेल्या लेणी आपल्याला आजही बिहारमध्ये गयेजवळ बघता येतात; परंतु भारतातल्या मंदिरस्थापत्याचा विचार करताना आपण वाचतो, की गुप्त काळात म्हणजे ‘कॉमन इरा’च्या चौथ्या शतकात बांधलेली मंदिरं आज भारतात अस्तित्वात असलेली सर्वात प्राचीन मंदिरं आहेत. साधारणतः दीड हजार वर्षापूर्वी दगड-विटांनी बांधलेली ही प्राचीन मंदिरं आजही आपल्याला मध्य प्रदेशातल्या सांची आणि भितरगाव या ठिकाणी पाहायला मिळतात. अर्थात्‌, ही मंदिरं अगदी साधी आहेत. पुढं मंदिरस्थापत्यशास्त्र जसजसं प्रगल्भ होत गेलं तसतशी मंदिरं अधिकाधिक भव्य होत गेली. आज आपण जेव्हा तंजावरमधलं हजार वर्षं जुनं असलेलं बृहदीश्वराचं भव्य मंदिर बघतो तेव्हा आपली छाती ते अद्भुत मंदिर बघून दडपूनच जाते. भारतीय द्रविड स्थापत्यशैलीचा सर्वात प्रगत आविष्कार या मंदिरात बघायला मिळतो. सांची ते तंजावर हा भारतीय मंदिरस्थापत्यशास्त्राचा पाचशे वर्षांतला प्रवास हा खरोखरच स्तिमित करणारा आहे.

भारताच्या विविध भागांतली प्राचीन मंदिरं, त्यांच्या स्थापत्यशैलीमधलं वैविध्य, त्या त्या मंदिराच्या आराध्यदेवतेची स्थापना करण्यामागचा त्या त्या काळातला धर्मविचार, त्या मंदिरांच्या शिल्पवैभवाची ओळख, त्यामागच्या कथा, त्या मंदिरांचा, त्यांच्या निर्मात्यांचा प्रेरणादायक इतिहास आणि अगदी आजच्या काळात ही मंदिरं बघताना आपल्या मनात जाग्या होणाऱ्या भावना या सगळ्याची ओळख या नवीन साप्ताहिक सदरातून ‘सकाळ’च्या वाचकांना होणार आहे. हे सदर वाचकांना त्यांच्या भारतभ्रमंतीमध्ये निश्चित उपयोगी पडेल अशी आशा आहे.
(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com