मित्रांनो, एक नोकरी गेली म्हणजे आपलं आयुष्य संपत नाही...

मित्रांनो, एक नोकरी गेली म्हणजे आपलं आयुष्य संपत नाही...

कोरोना नावाच्या जागतिक महामारीमुळे जगासमोर अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे. हे संकट समाजाच्या अनेक पातळ्यांवर आहे. वैद्यकीय, आर्थिक, सामाजिक, मानसिक अशा विविध पातळ्यांवर संकट उभे राहिले आहे. कोरोनाचा महामारीचा प्रसार रोखण्यासाठीअनेक देशांनी लॉकडाऊनची उपाययोजना केली आहे. या रोगाला रोखायचे हे एकमात्र यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. मात्र लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. आर्थिक व्यवहारच थांबल्यामुळे किंवा फारच कमी प्रमाणात सुरू असल्यामुळे त्याचा विपरित परिणाम मनुष्यबळावर झाला आहे. या संकटामुळे जगभरात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे आणखी एक नवे संकट उभे ठाकले आहे. जीव वाचवायचा की उपजीविकेचा बचाव करायचा अशा कात्रीत जग सापडले आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांनी यासंदर्भातील अहवाल प्रकाशित केले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार जाण्याची माहिती देण्यात आली आहे. काही रोजगार आतापर्यतच्या कालावधीत गेले आहेत, तर काही रोजगार आगामी काळात जाणार आहेत. याचा परिणाम असा होतोय कि लोकं प्रचंड प्रमाणात पॅनिक होऊन आत्महत्या सारखे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करत आहेत.

 काल सुट्टी असल्यामुळे थोडासा वेळ मिळाला म्हणून मित्रांचे काय सुरु आहे याची विचारपूस करण्यासाठी फोन करत होतो. पुण्यातील वडगाव भागात राहणाऱ्या मित्राला फोन केला तेव्हा त्याच्या घरातील व्यक्तीने उचलला आणि त्यांनी सांगितलेल्या बातमीने मला प्रचंड धक्का बसला. माझ्या जवळच्या मित्राने कामावरून कमी केले म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो त्यातून वाचला. तो सध्या कोणाशी बोलण्याच्या मानसिकेत नव्हता. परंतु मी त्याला बोलायला भाग पाडलं. मी त्याला विचारलं असं का केलं त्यावर माझा मित्र म्हणाला स्वतःवर वेळ आल्याशिवाय कळत नाही एवढं एकच वाक्य बोलून त्याने फोन ठेवला. मी ही क्षणभर विचार केला अन आपला जॉब गेल्यानंतर काय होऊ शकतं याचं चित्र डोळ्यासमोर उभे राहिले अन अस्वस्थ झालो. 

कोरोना या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. अनेक आयटी व इतर कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनी तोट्यात आहे म्हणून कामावरून कमी करत आहेत. तर काही कामावर ठेवत आहे पण तीन महिन्यांपासून पगार दिलेला नाही. खरं तर दहा-वीस-पन्नास हजार रुपये पगार असलेल्याना नोकरीवरून काढण्याचा सल्ला जे लोक मालकांना देतात, ते लाखो रुपयांच्या पॅकेजवर ठाण मांडून बसले असतात हे ते सोयीस्कररित्या विसरत असतात. यामुळे माझ्या मित्रासारखे काही लोक अस्वस्थ होत आहेत. इतक्या दिवस आपण कंपनीसाठी आपण कामाचे असतो पण एका दिवसामध्ये आपण कामाचे नसतो हे आपल्याला सांगितले जाते तेव्हा साहजिक खूप वाईट वाटते. त्यातून वेगवेगळे विचार करून माणूस नैराश्यग्रस्त होऊन असे विचित्र पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. 

काही काळापासून चांगली पगार देणारी नोकरी ही भरवशाची मानली जायची ती नोकरी आता बेभरवशी झाली आहे. आज मुलांना आपल्या साठीतील आई वडिलांना माझ्याकडे नोकरी नाही. मला कामावरून काढून टाकलं आहे हे सांगण्याची वेळ येत आहे. नोकरीच्या जोरावर असलेलं होम लोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड याची बिलं कशी भरायची या प्रश्नाने आणि विचाराने माणूस पुरता भांबावून जातो. त्यात लग्न झाले तर असेल तर बायकोला काय सांगणार, कसं उत्तर देणार तसंच सासरवाडीच्या लोकांनी विचारलं काय उत्तर देणार सहा विचारून खचून जातो. म्हणून आत्महत्यासारखे पाऊल उचलणं योग्य नाही. 

नोकरी गेली म्हणून सारं जग आपल्यासाठी संपत नाही. मध्यम वर्गातील माणसांना तर संघर्ष करण्याची जन्मापासून सवय असते. त्यांनी संघर्षेतून इथपर्यंत मजल मारलेली असते. एक नोकरी गेली म्हणून आपण खचलो तर आपण संघर्ष करायला विसरलो आहे असेच म्हणावे लागेल. कोरोनाचे संकट आले अन आपली नोकरी गेली तर आपण टोकाचा निर्णय घेतो. थोडा विचार काळ परवा आलेल्या निसर्ग वादळाने कोकणातील लोकांच्या आयुष्य हो त्याचे नव्हतं केलं. कित्येक कुटुंब दहा-वीस वर्षे मागे गेली. काही तर एकदम उघडयांवर येऊन त्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. तरीही त्यांची परत उभा राहण्याची जिद्द बघून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. 

नोकरी गमावल्याची वेळ जर आपल्यावर आली तर आपल्या कुटुंबाला विश्वासात घ्या आणि परत जिद्दीने उभा राहण्याची उमेद त्यांना द्या. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे प्रत्येक घटनेच्या शेवट झाल्यानंतर दुसऱ्या नवीन घटनेची सुरुवात असते. त्यातूनच नवनिर्माण होत असतो अन आपणही त्याला तेवढ्याचं ताकदीने सामोरे गेले पाहिजे. शेवटी एकच विनंती अशी वेळ आली तर असं टोकाचं पाऊल उचलून काही बर वाईट करू नका. धीर धरा आणि संयमाने परिस्तिथीला सामोरे जा.

special motivational article dont worry if you lose your job due to corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com