

India toxic & legal liquor crisis
‘शहाणा माणूस चंद्राकडे बोट दाखवतो, तेव्हा मूर्ख माणसे चंद्राऐवजी बोटाकडेच बघत राहतात,’ अशी चिनी म्हण आहे. भारतात दरवर्षी दारूमुळे लाखांवर मृत्यू होतात असे जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. ही दारू मिथेनॉलमिश्रित नाही, तर ‘शुद्ध’ ‘बिन-विषारी’ आहे! यातील जवळपास अर्धी दारू शासकीय व उरलेली अर्धी अवैध आहे. एकूण वैध व अवैध दारू ही खरी समस्या आहे. विषारी दारूचे दरवर्षी पाचशे ते आठशे मृत्यू दारूच्या एकूण तीन लाख मृत्यूचा किंचितसा भाग आहे, त्यामुळे बोट बघू नका, चंद्र बघा!
चार, सात, अकरा, अठरा. पिंपरी-चिंचवडच्या विषारी दारूच्या बळींचा आकडा रोज वाढतो आहे. घटना मानवनिर्मित व दु:खद आहे. त्या गुन्ह्याची चौकशी वगैरे यथासांग होईल. शासनातर्फे मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर होईल व मग महाराष्ट्र पुन्हा दारू पिण्यास मोकळा होईल
या विषारी दारू-कांडाच्या निमित्ताने लक्षात घेऊया की,
भारत सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार विषारी दारूने भारतात दरवर्षी पाचशे ते आठशे मृत्यू होतात. त्यातील सर्वांत जास्त मृत्यू मध्य प्रदेश, कर्नाटक, पंजाब, छत्तीसगड, उत्तर प्रदेश व झारखंड या राज्यांत होतात. तुलनेने महाराष्ट्रात यांची संख्या कमी आहे.
विषारी दारूच्या असल्या घटनांमध्ये बहुतेक वेळा पिण्याच्या दारूमध्ये घातक मिथेनॉल मिसळलेले असते. त्यामुळे ती दारू स्वस्त, तीव्र नशा देणारी पण विषारी बनते. वैध दारू महाग, विषारी दारू स्वस्त.
अशा घटनांमध्ये पिणारे सहसा अशिक्षित, गरीब मजूर असतात. विकणारे स्थानिक भुरटे हातभट्टीवाले असतात. पण केवळ कारखान्यासाठी असलेले मिथेनॉल छुप्या मार्गाने बाहेर विकणारे, तसेच हातभट्ट्यांची माहिती असूनही तो धंदा चालू देणारे स्थानिक पोलिस व अबकारी विभागाचे कर्मचारी देखील या गुन्हेगारी साखळीचा भाग असतात.
वरील सर्व राज्यात दारू खुली आहे. म्हणजे विषारी दारूसाठी दारूबंदी हे कारण नाही व दारू खुली केल्याने विषारी दारू थांबत नाही.