१९७१ : स्मरण एका चातुर्यपूर्ण मोहिमेचे

बांगलादेशातील युद्धाची कारवाई ही तेथील नागरिकांना दडपशाहीपासून मुक्तता मिळवून देण्यासाठी दिलेला पाठिंबा होती.
Bangladesh War
Bangladesh WarSakal

- ॲडमिरल (निवृत्त) मोहन रामन्‌

बांगलादेशातील युद्धाची कारवाई ही तेथील नागरिकांना दडपशाहीपासून मुक्तता मिळवून देण्यासाठी दिलेला पाठिंबा होती. आपल्या लष्कराने स्वातंत्र्यसैनिकांना प्रशिक्षण दिले, काही पावले त्यांच्याबरोबर टाकली आणि ध्येय प्राप्त होताच चांगुलपणा दाखवत युद्धविरामही केला. आपण १९७१ या वर्षी कोणताही गाजावाजा न करता जे करून दाखवले, ते या सर्वांनी एकत्रितपणे आखलेल्या चातुर्यपूर्ण मोहिमेचे स्मरण आहे.

जग १९७१च्या युद्धानंतर बदलले आहे. त्या काळातील कोणत्याही देशाचे एकही राजकीय अथवा सैनिक नेतृत्व आता जिवंत नाही, मात्र, त्या युद्धात लढलेले काही अगदी कनिष्ठ पातळीवरील लोक आपले वैयक्तिक अनुभव सांगण्यासाठी जिवंत आहेत. युद्धानंतरच्या विजयोत्सवाची धार आता कालानुरूप हळूहळू कमी झाली आहे. पाकिस्तानने त्यांच्या नागरिकांचा केलेला भयंकर नरसंहारही बांगलादेशाने मोठ्या मनाने माफ केला आहे. भारतात आपण या युद्धाचा उल्लेख मोठ्या आदराने करीत आहोत, तत्कालीन नेत्यांचे धैर्य, समजूतदारपणाचे गुणगान करीत आहोत. आता या युद्धाचा विचार करणे, कोणत्या गोष्टी अंतर्गत विषय म्हणून ठेवायच्या हे शोधणे व स्मरणरंजनाच्या पुढचा विचार करण्याची वेळ आली आहे. भारताच्या पुढील पिढ्यांसाठी ती चिरस्थायी सेवा ठरेल. आज धडे घेण्याचा मार्ग युद्धात सहभागी झालेल्यांच्या वैयक्तिक आठवणी, पुस्तके व इतर माध्यमांतील नोंदी हेच आहेत. दुसऱ्या प्रकारची माहिती मुख्यतः सहभागींनी व स्तुतीपाठकांनी सांगितलेले किस्से हीच आहे. अशा माहितीमध्ये संबंधित व्यक्तींनी केलेली स्वतःची प्रशंसा असते व हे साहजिकच आहे. या माहितीत अर्थातच पक्षपात करण्यात आलेला असतो. इतिहासकारांना त्या काळातील बैठका व चर्चांसंदर्भातील सरकारी कागदपत्रे उपलब्ध करून दिल्यास ते आदर्श ठरेल. मात्र, ही कागदपत्रे अद्याप उपलब्ध नाहीत, त्यांचे संपादित रूपही उपलब्ध नाही आणि त्याचे काही दुर्दैवी दुष्परिणाम पुढे आले आहेत.

माहितीची अनुपलब्धता समस्या

आपण वैश्‍विकदृष्ट्या एकत्रित आलेल्या वातावरणात राहतो आहोत. येथे प्रत्येक समस्येचा परिणाम सीमांचा विचार न करता त्यात सहभाग असलेल्या प्रत्येकावरच होत असतो. १९७१च्या युद्धात सहभागी असलेल्या भारत, पाकिस्तान व बांगलादेश या तिन्ही देशांतील इतिहासकार व लेखकांना अमेरिकेसारख्या देशाने प्रकाशित केलेल्या माहितीवर अवलंबून राहणे भाग पडले. त्याला स्थानिक माहितीची अत्यल्प जोड मिळू शकली. प्रत्येक क्षेत्रातील राष्ट्रीय नायकांवर स्तुतिसुमने वाहणे हा मानवी स्वभावच आहे. यात काही वेळा पक्षपातही केला जातो. लेखकांना जेव्हा १९७१च्या युद्धात मोठी प्रसिद्धी मिळालेल्या एखाद्या महान व्यक्तिमत्वाचे कार्य जेवढी स्तुती झाली, तेवढे महान नव्हते हे सांगायची वेळ येते, तेव्हा मोठे विवाद निर्माण होतात. पंतप्रधान इंदिरा गांधी व फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्या चितारलेल्या प्रतिमांचे पुनर्अवलोन करण्याची वेळ नंतरच्या काळात आली. सुरवातीला काही जणांना असे वाटले, की फिल्ड मार्शलांनी ढाका ताब्यात घेण्याच्या घटनेचे योग्य नियोजन केले नाही व अपेक्षित उत्साहाने त्याला पाठिंबाही दिला नाही. मात्र, या घटनेचे सोईस्कर पद्धतीने विश्‍लेषण केले गेले व या सैनिकी अधिकाऱ्याचे प्रतिमाहनन होणार नाही याची काळजी घेतली गेली. ‘पुरेशी तयारी केल्याशिवाय कायमचे शत्रुत्व घेण्यापासून आपण पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपण परावृत्त केले,’ या फिल्ड मार्शलांच्या काही काळापूर्वी प्रसिद्ध झालेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला होता. असे झालेले असूही शकते, कारण पंतप्रधानांचा स्वभाव हेकेखोर नक्कीच नव्हता. मात्र, असे घडले होते अथवा नाही, याचे उत्तर त्यावेळी झालेल्या बैठकींचा वृत्तांत हाती पडल्याशिवाय मिळू शकणार नाही. १९७१च्या युद्धाचे अनेक परिणाम झाले, याबद्दल थोडीही शंका नाही. त्याशिवाय, युद्ध केवळ बांगलादेशाच्या सीमेपुरते मर्यादित नव्हते.

भारताची युद्धसज्जता

बांगलादेशाच्या नागरिकांना त्यांच्या अडचणीच्या काळात मदत करण्याशिवाय आपल्या देशाला इतर दिशांनी आलेल्या अनेक आव्हानांचा मुकाबला करावा लागला होता. हिमालयाच्या बाजूने आपला शत्रू चीन होता व तो कधीही युद्धात हस्तक्षेप करण्याची शक्यता होती. आपला द्वेष करणारा पाकिस्तान व त्याला पश्‍चिमी देशांकडून मिळालेल्या जमिनी व हवाई युद्धाच्या सामग्रीमुळे या आघाडीवर मोठे आव्हान होते. पाककडे असलेली सागरी क्षमताही त्यांच्या देशातील किनाऱ्यावरून हल्ला करीत भारताला तडाखा देण्यास सक्षम होती. अशा अकस्मित संकटांचा सामना करण्यासाठी तिन्ही लष्करी सेवांनी त्यांच्या सामग्रीचे एकत्रीकरण करणे व ते लढण्यायोग्य ठेवणे आवश्‍यक असते. इंधन व शस्त्रास्त्रांचासह आवश्‍यक गोष्टींचा पुरवठा पूर्व आणि पश्‍चिम दिशांना सिद्ध ठेवणे, तसेच आपले सर्व किनारे व व्यापारी मार्ग सुरक्षित ठेवणेही आवश्‍यक होते. आपल्या मर्यादित सामग्रीचे वाटप विवेकबुद्धीने करणेही आवश्‍यक होते. सैनिकांना एकत्र आणणे आणि मोहिमेसाठी त्यांना प्रशिक्षण देणेही गरजेचे होते. शेवटी प्रत्येक आघाडीवर नियोजन करणे, त्यासाठी युद्धाच्या ठिकाणाच्या हवामानाचा आणि सैनिक कोणत्या उंचीवरून लढणार आहे याचाही अंदाज गरजेचा होता. केंद्र व राज्य सरकारच्या नागरी आणि गुप्तहेर संघटनांमध्ये नेटका समन्वय आवश्‍यक होता आणि या संघर्षासाठीची नागरिकांची भावनिक तयारीही आवश्‍यक होती. जगभरातील इतर देशांनी पाकिस्तानकडून होत असलेल्या नरसंहाराची कल्पना देणे गरजेचे होते. या प्रक्रियेत अनेकदा नागरिक व सरकारची दिशा वेगवेगळी असण्याची भीती असते. एक महत्त्वाचा फरक म्हणजे, अनेक सरकारांनी पाकच्या हिंसाचाराकडे डोळेझाक करीत संयुक्त राष्ट्रसंघात भारताला पाठिंबा नाकारला. बांगलादेशातील कारवाई दडपशाहीपासून मुक्ती मिळवण्यासाठी दिलेला पाठिंबा होती. आपल्या लष्कराने स्वातंत्र्य सैनिकांना प्रशिक्षण दिले, काही पावले त्यांच्याबरोबर टाकली आणि ध्येय प्राप्त होताच चांगुलपणा दाखवत माघारही घेतली. आपला उद्देश उत्तर दिशेला सावध राहणे, हिमालयाकडून हस्तक्षेपाचा प्रयत्न झाल्यास तो परतवून लावणे एवढाच होता. खरेतर, आपल्या सैन्यदलांची विचार केलेला पर्याय देशासाठी फारसा योग्य नव्हता. पश्‍चिमकडे आपल्या सैन्याने तळ ठोकून राहात जमीन किंवा हवेतून काश्‍मीरवर प्रतिहल्ल्याचा प्रयत्न झाल्यास तो परतवून लावण्याची तयारी ठेवली होती. दक्षिणेच्या जमिनी सीमेवरही हीच तयारी होता.

यश सांघिक कामगिरीचेच

या संघर्षाचे वास्तव देशवासीयांना आणि पाकिस्तानच्या जनतेलाही कळावे म्हणून कराची शहरावर हल्ला केला गेला आणि ते सर्वांना पाहता यावे म्हणून आगी लावण्यात आल्या. हे एकदा नव्हे, तर दोनदा केले गेले. हे लढाऊ जहाजे आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने केले आणि विशेष म्हणजे त्यांची मारकक्षमता कराचीपर्यंत पोचण्याची नसतानाही हे साध्य केले गेले. जगभरातील नौदल विद्यालयांमध्ये या कामगिरीचा खोलात जाऊन अभ्यास झाल्याचे सांगितले जाते. नौदलाने छेडलेल्या युद्धाने अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर व्यापला आणि त्यातून महासत्ता असलेल्या अमेरिकेशीही संघर्षाची वेळ आली. सागरांना कोणत्याही सीमा नसतात, हेच खरे. या सर्वांत आपल्या नव्या दमाच्या हवाई दलाने मोठ्या धैर्याने कामगिरी केली, त्यात नावीन्य आणले आणि निःस्वार्थ व समर्पित भावनेने काम केले. देशाने त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा ठेवावी? सरकार आणि लष्करी नेतृत्वाने त्यावेळी आपली योजना परिणामकारतेने तडीस नेल्याचे पाहिल्यावर यासाठी काय तयारी करावी लागेल याबद्दल त्यांना माहितीच नव्हते अशी कल्पना करणे भ्रामक किंवा बालिशपणाचेच ठरणार नाही का? आपण १९७१ या वर्षी कोणताही गाजावाजा न करता जे करून दाखवले, ते या सर्वांच्या एकत्रित चातुर्याचे स्मरण आहे. आपण १९७१मधील घटनांना कमी लेखत आणि ते सर्वांचे एकत्रित प्रयत्न नव्हते असे म्हणून आपल्यावर आणि या सर्वांनी केलेल्या प्रयत्नांवर मोठा अन्याय करीत आहोत.

(लेखक नौदलातील माजी ज्येष्ठ अधिकारी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com