कोरोनाचे संकट संपल्यानंतर राज्य सरकारने (Maharashtra Government) पुन्हा शिवभोजन थाळी दहा रुपयाला केली.
सातारा : मजूर, कष्टकरी व गरजू लोकांना आधार मिळण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने सत्तेत असताना राज्यभरात अल्प दरात शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali Yojana) योजना सुरू केली. मात्र, सध्या भाजप व शिंदे सरकारच्या काळात या योजनेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येतो. गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात आठ केंद्रे बंद झाल्याने गरिबांच्या थाळीला वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या तीन वर्षांपूर्वी राज्यभरात गरजू लोकांसाठी शिवभोजन थाळी सुरू केली होती. सुरुवातीला दहा रुपयात शिवभोजन थाळी होती. त्यानंतर काही दिवसांतच कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर मार्च २०२० नंतर दोन महिने सर्वच केंद्र बंद होती. काही कालावधी गेल्यानंतर कोरोनाच्या काळात पाच रुपयाला शिवभोजन थाळी देण्यास सुरुवात केली.
मात्र, राज्यात कोरोनाची भीषण परिस्थिती वाढतच गेल्याने गरजू नागरिकांची गैरसोय सुरू झाली. या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी सरकारने मोफत देण्यास सुरुवात केली. दरम्यान, कोरोनाचे संकट संपल्यानंतर राज्य सरकारने (Maharashtra Government) पुन्हा शिवभोजन थाळी दहा रुपयाला केली.
तरी देखील शिवभोजन थाळीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत होता. दिवसाला सरासरी दोनशे थाळ्यांत वाढ झाली होती. जिल्हाभरात केंद्रांची संख्याही वाढत होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या योजनेला घरघर लागली आहे. या योजनेचे अनुदान वेळेवर येत नसल्याने केंद्र चालकांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
शिवभोजन थाळी सुरू झाल्यानंतर गरजू लोकांचा दोन वेळचा जेवणाचा प्रश्न मिटला होता. मात्र, सध्याच्या सरकारने अनुदान न दिल्याने जिल्ह्यात चार ते पाच केंद्रचालकांनी सहा महिन्यांपूर्वी शिवभोजन थाळी बंद केली. आता नव्याने आठ केंद्रे बंद झाल्याने गरजू लोकांचे अल्प दरातील जेवण बंद होणार आहे.
योजना सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात ३५ हून अधिक केंद्रांच्या माध्यमातून दिवसाला सुमारे दोन हजारांहून अधिक थाळींचा लाभ मिळत होता. आता या विविध कारणांमुळे ही संख्या वीसवर आली आहे. त्यामुळे राज्य शासनाचे या योजनेकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
अनुदान वेळेवर न मिळणे
केंद्रातील तपासणीतील त्रुटी
शासनाचे योजनेकडे दुर्लक्ष
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.