राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली असली, तरी यावर्षी महाबळेश्वरमध्ये उन्हाळ्यातही गारवाच असल्याने येणारे पर्यटक खूष होत आहेत.
सातारा : गेले आठ दिवस उकाड्याने हैराण झालेल्या सातारकरांना रविवारी दुपारनंतर झालेल्या वळिवाच्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला. सुमारे दीड तासाहून अधिक काळ हा पाऊस (Rain) कमीजास्त प्रमाणात शहर, तसेच तालुक्याच्या विविध भागांत बरसत होता.
गेल्या आठ दिवसांपासून शहरातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यातच दाटून येणाऱ्या ढगांमुळे सातारकरांच्या अंगाची लाहीलाही होत होती. गेल्या दोन दिवसांपूर्वी वेधशाळेने साताऱ्यासह विविध भागांत पावसाचा अंदाज वर्तवला होता. या अंदाजानुसार रविवारी दुपारी शहर परिसरातील आकाश काळ्या ढगांनी व्यापून गेले.
साडेतीननंतर वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने शहर परिसरात हजेरी लावली. शहरासह परिसरात आणि तालुक्याच्या विविध भागास या पावसाने झोडपून काढले. दीड तासाहून अधिक काळ हा पाऊस शहर आणि परिसरात बरसत होता. या पावसामुळे काही प्रमाणात उष्णता कमी झाली होती.
महाबळेश्वर : सध्या उन्हाळी हंगाम सुरू होत असल्याने येथे गर्दी वाढू लागली आहे. काल पावसाने पर्यटकांची तारांबळ उडाली. राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली असली, तरी यावर्षी महाबळेश्वरमध्ये उन्हाळ्यातही गारवाच असल्याने येणारे पर्यटक खूष होत आहेत.
शुक्रवार, शनिवार व रविवार हे मुख्य गर्दीचे दिवस असून, सुटी असेल तर पर्यटकांची गर्दी वाढते. त्यामुळे सध्या महाबळेश्वरमध्ये उन्हाळी हंगाम जोरदार होण्याची आशा येथील व्यावसायिकांना आहे. आज सायंकाळी बाजारपेठेसह वेण्णालेक, सनसेट पाहण्याची ठिकाणे गर्दीने भरली होती. लग्नाचे मुहूर्त असल्याने लग्न मंडप सजलेली असताना अचानक पावसाचे आगमन झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला; परंतु व्यापाऱ्यांसह पर्यटक व लग्न सराईतांची तारांबळ उडाली.
ढेबेवाडी : ढेबेवाडी खोऱ्याला काल वादळी पावसाने झोडपून काढले. दुपारनंतर विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. नागरिकांची त्यामुळे तारांबळ झाली. शिवारात, तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले होते. श्री क्षेत्र नाईकबा येथे दर्शनासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातून आलेल्या भाविकांची पावसाने तारांबळ उडाली.
पार्किंग क्षेत्रात लावलेली वाहने अडकून पडली. विक्रेत्यांचीही धावपळ झाली. थोड्याफार नुकसानीला सामोरे जावे लागले. विभागातील काही ठिकाणी घरांचेही वादळाने नुकसान झाल्याची माहिती मिळाली. दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला. आज लग्नमुहूर्त असल्याने पावसामुळे वऱ्हाडी मंडळींची तारांबळ झाली. मंद्रुळकोळे येथील कृष्णात यादव यांच्या घराचे पत्रे वादळाने उडून नुकसान झाले. अन्य काही गावांतही नुकसानीच्या घटना घडल्याची माहिती मिळाली; परंतु त्याचा तपशील मिळाला नाही.
शिवारात, तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले होते. येथील बाजारपेठेत बस स्थानक परिसरातील चौकात रस्त्याला, तर नदीचे स्वरूप आले होते. पावसामुळे ओढेही खळखळून वाहिले. श्री क्षेत्र नाईकबा यात्रेनंतरच्या पाच पाकाळण्या गेल्या रविवारी संपल्या आहेत. मात्र, उन्हाळी सुट्यांमुळे भाविकांचा ओघ कायम आहे. आज तेथे दर्शनासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातून आलेल्या भाविकांची पावसाने तारांबळ उडाली.
पार्किंग क्षेत्रात लावलेली वाहने अडकून पडली. विक्रेत्यांचीही धावपळ झाली. काही विक्रेत्यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. पावसामुळे ठिकठिकाणी आंब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडाखाली कैऱ्याचा सडा पडल्याचे दिसून आले. आजच्या पावसामुळे खरीप पेरणीपूर्व मशागती सुलभ होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.